पुणे | प्रतिनिधी Pune
निवडणुका आल्यानंतर अनेकांना कंठ फुटतो. ते काहीतरी बोलत राहतात. ते बोलतात म्हणून आपण वैतागायचे नाही. नागरिकांना आपण केलेली विकास कामे दाखवायची. निरर्थक सवाल-जवाब झाला, तर विकास मागे पडतो, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लकिन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अधिकृत उमेदवारांसाठी आकुर्डी विठ्ठल मंदिर येथे शनिवारी फडणवीस यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. निवडणूक प्रचार प्रमुख शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे उमा खापरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, निवडणुका आल्यानंतर अनेक जण काहीतरी निरर्थक बोलत राहतात. आपण मात्र विकासावरच बोलत राहायचे. भाजपने केलेल्या कामांची गुणवत्ता गेल्या 25 वर्षातील कामांच्या तुलनेत सरस आहे. १५ वर्ष जेएनएनयुआरएम अंतर्गत स्वस्तातील घरांचे बांधकाम रखडले होते. १३ हजार घरांपैकी केवळ ६ हजार ७०० घरे विरोधकांना पूर्ण करता आली. मात्र २०१७ पासून भाजपच्या सत्ता काळात पिंपरी, बोऱ्हाडेवाडी, चऱ्होली, डुडुळगाव या भागांमध्ये २० हजार घरांची निर्मिती भाजपच्या माध्यमातून झाली. या घरांची गुणवत्ता विरोधकांनी एकदा पाहून घ्यावी.
पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी आपण २३०० कोटीचा प्रकल्प तयार केला आहे. गेल्या पंचवीस तीस वर्षात रखडलेला शहराचा साडेबारा टक्के परताव्याचा प्रŽ सोडवला तसेच लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या मागणीप्रमाणे शास्तीकरदेखील पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केला. आगामी काळात मेट्रोचे विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात केले जाईल. तिसरी मेट्रो या शहराला देण्यात येणार आहे. विकास आराखड्यातील रस्ते आपण मोठे करत आहोत. एलिवेटेड पॅरीडोर, उड्डाणपूल, अंडर पासच्या माध्यमातून वाहतूक सुलभ केली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कोल्हापूरच्या धर्तीवर निळ्या, लाल पूररेषेसाठी नवा डीसीपीआर
पिंपरी चिंचवड सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेर सर्वेक्षण करून निळी आणि लाल पूररेषा नव्याने आखणी करण्यात येणार आहे. फ्लड मेटिगेशन मेजर्सनुसार कोल्हापूरच्या धर्तीवर नवा डीसीपीआर केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. निळी आणि लाल पूररेषेचा प्रŽ युनिफाईड डीसीपीआरमुळे निर्माण झाला. यातील काही तरतुदींमुळे तांत्रिक अडचण आली आहे. नदी लगतच्या अनेक भागांमध्ये नवीन डेव्हलपमेंट थांबलेली आहे. निळी आणि लाल पुररेषा 100 वर्षांपूर्वीच्या गृहीतकांवर आधारित आहे. त्या वेळच्या पूररेषेच्या मार्किंगनुसार ही रेषा ठरली होती. यासंदर्भात अनेक तक्रारी नागरिकांकडून येत आहे, असे त्यांनी नमूद केले.




