नाशिक l Nashik (प्रतिनिधी)
शहरातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित, दोन विशेष आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य नियमाने तब्बल सात फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असली तरी अजूनही सुमारे ५ हजार ७६९ जागा रिक्तच राहिल्या आहेत.
अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या एकूण ३२ हजार ५७ विद्यार्थ्यांपैकी १९ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत तब्बल १२ फेऱ्या घेण्यात आल्या.
तरीही सुमारे ५ हजारहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६० कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत ३२ हजार ५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतर २६ हजार ८०४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जाचा भाग एक भरला होता.
यात भाग दोन भरताना आणखी विद्यार्थ्यांची गळती होऊन २४ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जाचा भाग दोन भरून त्याची पडताळणी करून घेतल्याने ते प्रवेशासाठी पात्र ठरले होते. यातील केवळ १९ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. तर ५ हजार ७६९ जागा रिक्त राहिल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.