मुंबई । प्रतिनिधी Mumbai
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या ५ लाख ३० हजार शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी गुरुवारी येथे दिली. मार्च २०२३ पासून विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ९ हजार ३०७ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मकरंद जाधव पाटील यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाचा आढावा घेतला. य पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सरकारकडून आपत्ती बाधित शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली. शेतकऱ्यांचे ई-केवायसी त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविल्याने प्रलंबित प्रकरणांची पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली. या धोरणात्मक उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरण करणे शक्य झाले असल्याचे जाधव – पाटील यांनी सांगितले.
नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रति राज्य सरकार संवेदनशील असून ही भरपाई शासनाच्या आपत्कालीन प्रतिसादाची प्रतिबद्धता दर्शवते, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान नाशिक महसूल विभागातील जळगाव जिल्ह्यात ४ हजार २७४ शेतकऱ्यांना ५ कोटी ६५ लाख रुपये, नाशिक जिल्ह्यातील ५ हजार ४२ शेतकऱ्यांना ४ कोटी ४३ लाख रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यातील २ हजार ९७५ शेतकऱ्यांना २ कोटी ५४ लाख रुपये, धुळे जिल्ह्यातील ४८३ शेतकऱ्यांना ४६ लाख रुपये तर नंदुरबार जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांना २ लाख ७८ हजार रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती, मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी दिली.