पुणे(प्रतिनिधी)
राज्य सरकारच्या ‘माझी लाडकी बहीण’ या लोकप्रिय योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस आले असून, यामध्ये पुणे जिल्हा परिषदेतील ५४ महिला कर्मचारी अडकल्या आहेत. शासकीय सेवेत असतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
महिला व बालकल्याण विभागाच्या चौकशी अहवालानंतर ही माहिती प्रकाशात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या संदर्भात सांगितले की, दोषींवर कारवाईची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
या योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यात आतापर्यंत तब्बल २ कोटी ६३ लाख महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ कोटी ४१ लाख महिलांना पात्र मानण्यात आले. मात्र, विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या पुढील छाननीत मोठ्या प्रमाणावर अर्ज अपात्र ठरले.
जून महिन्यात झालेल्या आढाव्यात गैरव्यवहारांचे प्रमाण स्पष्ट झाले. त्यातच जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांनी पात्रतेच्या अटी मोडून योजना मिळवली असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.





