नाशिक । प्रतिनिधी
विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटांसह शनिवारी (दि.१९) धुवाधार पावसाने अर्धा ते एक तास शहरासह जिल्ह्याला झोडपले. जोरदार पावसाने जनजीवन विस्कळित झाले. शहर परिसरातील बाजारपेठा, रस्ते या ठिकाणी पाणी साचले होते..
अर्धा तासात सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान हवामान खात्याने पुढिल काहि दिवस पावसाचा जोर कायम राहिल असा इशारा दिला आहे.
जुन व जुलैत पाठ फिरवणारा पाऊस आॅगस्टमध्ये जोरदार बरसला. सप्टेंबरमध्येही वरुणराजाची कृपादृष्टी कायम आहे.
आता पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात पावसाचा कहर सुरु आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे.
पुढिल आठ दिवस पावसाचा जोर असेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शनिवारी त्याची प्रचिती शहर व जिल्ह्यात पहायला मिळाली. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजेचा कडकडाट व ढगाच्या गडगडात जोरदार पावसाला सुरुवात झाली.
सर्व छायाचित्रे : सतीश देवगिरे, नाशिक
अर्धा तासाच्या पावसाने शहर व उपनगरिय परिसराला झोडपून काढले. अर्धातासात सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. जुने नाशिक, सराफ बाजार, दहिपूल, नेहरु चौक, भांडि बाजार यांसह मध्यवर्ती अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे दुकानदार, व्यावसायिकांची तारांबळ उडाली.
पंचवटी, सातपूर, सिडको, म्हसरुळ, आडगाव या सर्व उपनगरिय परिसरात वरील परिस्थिती कायम होती. पुढिल काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल. नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.