Tuesday, March 25, 2025
Homeनगरसाहित्यातून मराठी राजकारणाचे प्रतिबिंब उमटत नाही, परिसंवादातील सूर

साहित्यातून मराठी राजकारणाचे प्रतिबिंब उमटत नाही, परिसंवादातील सूर

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, दिल्ली | Delhi

साहित्यातून मराठी राजकारणाचे प्रतिबिंब उमटत नाही. मराठी साहित्यिक वेगवेगळ्या विषयांवर लिहितात, पण राजकीय जाणिवेतून सामाजिक, आर्थिक शोषण केले जाते. त्याविषयी थेटपणाने ते लिहिणार आहेत का? राजकारण आज ज्या दिशेला चालले आहे, त्याला एक नवे वळण देण्याचे काम मराठी साहित्यिक करतील का? असे प्रश्न राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब या परिसंवाद उपस्थित झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सरहद, पुणे आयोजित 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात डॉ.समीर जाधव, धीरज वाटेकर, पत्रकार शैलेश पांडे, सुरेश भटेवरा, पुणे लोकमतचे संपादक संजय आवटे सहभागी झाले होते.

- Advertisement -

डॉ. समीर जाधव म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीच्या काळात ज्या प्रकारे राजकारणावर थेटपणे बोलले गेले, तशी एक वेगळी चळवळ आज उभी राहिली आहे. त्या चळवळीविषयी थेटपणाने साहित्यिक बोलणार आहेत का? की ते फेक नरेटिव्हचे बळी पडतील? लेखक, साहित्यिक आजच्या राजकारणावर थेट भाष्य करत सत्य, वास्तव मांडतील का?
साहित्याच्या परिप्रेक्षामध्ये सहजपणे यावे, असे राजकारणात घडते आहे. पण जेव्हा अभिव्यक्तीच्याच वाटा बंद होतात, तिथे साहित्यात काय उमटणार? आजच्या लेखण्याही तुरुंग तोडण्यापेक्षा आहे, त्या तुरुंंगाला गज बसवण्याची भाषा करत आहेत. जे स्पष्टपणे मांडायला हवे आहे ते कोमेजले आहे, असे परखड मत संजय आवटे यांनी व्यक्त केले. साहित्य ही मुळातच राजकीय कृती आहे. जगाचा अंदाज आणि अदमास घेण्याची क्षमता आपल्या साहित्यिकांची आहे का? अभिव्यक्तीच्या नव्या सर्जनशील वाटा शोधण्याची क्षमता आणि किंमत चुकवण्याची तयारी आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

सामना, सिंहासन या राजकीय पट असलेल्या चित्रपटांनंतर राजकीय कथानकाचा अभावच आढळता, अशी कथानके साहित्यातून निर्माण व्हावीत ही साहित्यिकांची जबाबदारी आहे, अशी भूमिका सुरेश भटेवरा यांनी मांडली. न्यायालयाचे निकाल सरकार धार्जीणे असल्याचा आरोप करताना नव्या पत्रकारांची दया येते, असे मतही त्यांनी मांडले. प्रसिद्धी माध्यमांनी सरकारची गुलामगिरी पत्करली हे माध्यमांचे दुर्दैव आहे. लेखकांनाही प्रकाशकांच्या अपेक्षेनुसार साहित्य निर्मिती करावी लागते असे चित्रही पहावयास मिळत आहे. राजकारणाला सत्याचा आधार लागतो. तो निखळला तर साहित्यच काय इतर कशालाच अर्थ नाही असे जयदेव डोळे म्हणाले. सध्या उथळ आणि कणाहीने लेखनाचा पूर आला आहे. त्यात प्रामाणिक माणसाचे मन गुदमरून जात आहे. त्याला वास्तव लिहिताना विचार करावा लागतो. माझ्यातला लेखक मेलाय असे कुणाला म्हणावे लागणे हे दुर्दैव असल्याचे धीरज वाटेकर म्हणाले.

रंजनातून प्रबोधनाची वाटचाल फारशी होत नाही. साहित्यिकांनी राजकारणातील चांगल्या घटनांचाही विचार करायला हवा, अशी अपेक्षा शैलेश पांडे यांनी व्यक्त केली. राजकारण फार बहुरंगी, बहुढंगी आहे ते तसे चित्रित करण्याची क्षमता लेखकांत असते. मात्र हल्ली लोक लिहित का नाहीत, समकालीन लोक राजकारण्यांना घाबरतात का, स्पष्ट लिहिल्यामुळे आपल्यावर शिक्का बसेल का, की एकांगीच लिहावे, असे ठरवून लिहिले जाते का असे अनेक प्रश्न पांडे यांनी उपस्थित केले. गेल्या वीस वर्षातील आमुलाग्र राजकीय बदलाला स्विकारताना साहित्यिक दिसत नसल्याचा आरोपही या परिसंवादाच्या निमित्ताने करण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, उल्हास पवार आदी उपस्थित होते. अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे प्रदीप दाते यांनी आभार मानले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...