Saturday, May 4, 2024
Homeनगरनिधी संकलनातून मनामनाला रामाशी जोडण्याचा प्रयत्न - स्वामी गोविंददेव गिरीजी

निधी संकलनातून मनामनाला रामाशी जोडण्याचा प्रयत्न – स्वामी गोविंददेव गिरीजी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

श्रीराम हे आपल्या देशाचे प्राणतत्त्व आहेत. जेथे राम नाही, ते राष्ट्रच नाही. वाल्मिकी रामायणातही रामचंद्रांच्या वनवासाच्यावेळी केलेले वर्णन असेच सांगते.

- Advertisement -

गेली पाच शतके या देशातही राम नव्हता, आता त्या जन्मस्थळी जेव्हा राम विराजमान होतील तेव्हा राष्ट्रही आपोआप उभे राहील. जगात भारता एवढा समृद्ध, निसर्गसंपन्न आणि परंपरा लाभलेला अन्य देश नाही. फक्त या देशाला त्याच्या स्वत्वाची जाणीव करून देण्याची गरज होती. अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी निधीची कमी नव्हती, तर या मंदिराशी मनामनाला जोडण्याचा भाव होता म्हणूनच निधी संकलनाचा उपक्रम राबविल्याचे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी संगमनेर येथे केले.

संगमनेरचे कर्मयोगी असलेल्या स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची अयोध्येतील श्रीराम जन्मस्थळी उभ्या राहणार्‍या मंदिराच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा संगमनेरकरांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

संगमनेरच्या प्रथम नागरिक, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक अशोकराव सराफ, सहसंघचालक सुभाष कोथमिरे, डॉ. संजय मालपाणी व मनिष मालपाणी, निधी संकलन अभियानाचे जिल्हा प्रमुख श्रीकांत नळकांडे, सहप्रमुख ज्ञानेश आकसाळ व दीपक जोंधळे, तालुका प्रमुख विशाल वाकचौरे, सहप्रमुख प्रविण कर्पे व विवेक कोथमिरे, शहर व प्रखंड अभियान प्रमुख गिरीश डागा, कार्यालय प्रमुख प्रशांत जोशी, सहप्रमुख मंगेश सालपे, हिशोब प्रमुख विरेश आडेप, ओकार राठी, प्रचार प्रमुख ज्ञानेश्वर बकरे आणि अन्य सहयोगी संस्थांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत स्वामीजींचा नागरी सत्कार करण्यात आला.

स्वामीजी म्हणाले, आपल्या देशाचा आत्मविश्वास संपविण्यासाठी परकीय आक्रमकांनी गेली अनेक शतके आक्रमण करुन आपल्या पूर्वजांवर अनन्वीत अत्याचार केले. आपल्या देशातील मंदिरे उध्वस्त करण्यामागेही हेच कारण होते. प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थळी विक्रमादित्याने बांधलेले मंदिर जेव्हा बाबराने उद्ध्वस्त केले तेव्हा भारतीयांनी मोठा संघर्ष केला.

आजवर अनेकवेळा तो होत राहिला. अवघ्या तीन एकर जागेसाठी गेली पाच शतके वारंवार झालेल्या संघर्षात तीन लाखांहून अधिकांनी आपले प्राण दिले आहेत. गेल्या 5 ऑगस्ट रोजी त्याच जागी मंदिराचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भूमीपूजन झाले आणि आपल्या सर्वांच्या मनातून हरपलेला तो आत्मविश्वास पुन्हा एकदा निर्माण झाला.

मानवी जीवनमूल्यांची साकार प्रतिमा असलेल्या श्रीराम मंदिराच्या पहिल्या टप्प्यात प्रकारातील तीन एकर जागेत बांधकाम केले जाईल व त्यानंतर 67 एकर जागेत, जी नंतर वाढवून 108 एकरपर्यंत विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. माझ्या जीवनाचा आध्यात्मिक प्रवास संगमनेरातून सुरू झाल्याचे सांगतांना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

प्रास्तविकात डॉ. संजय मालपाणी म्हणाले, हे मंदिर केवळ मंदिर नसेल तर राष्ट्रचेतनेचे एक प्रतिक असेल. घराघरांत राम निर्माण झाला पाहिजे ही प्रेरणा स्वामीजींनी 35 वर्षांपूर्वी गीता परिवाराच्या स्थापनेवेळी आम्हाला दिली होती. श्रीराम मंदिराच्या निर्मितीतून ही प्रेरणा घराघरांत पोहोचावी यासाठीच निधी संकलनाचा उपक्रम राबविला गेला असून त्यात प्रत्येक भारतीयाने आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

विनय गुणे यांनी लिहिलेल्या मानपत्राचे वाचन प्रज्ञा म्हाळस यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनंत दिवेकर यांनी तर आभार गिरीश डागा यांनी मानले.

सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असलेल्या मालपाणी परिवाराने अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निधी संकलनातही आपल्या दातृत्त्वाचे दर्शन घडवले. या कार्यात तन-मन-धन समर्पित करीत राष्ट्रमंदिराच्या निर्मितीसाठी मालपाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्या श्रीमती ललितादेवी व श्रीमती सुवर्णा मालपाणी यांच्यासह राजेश मालपाणी, डॉ. संजय मालपाणी, मनिष मालपाणी, गिरीश मालपाणी आणि संगीता, अनुराधा, रचना व सुनीता मालपाणी यांच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांचा धनादेश स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपस्थित संगमनेरकरांनी उभे राहून मालपाणी परिवाराच्या दातृत्त्वाला टाळ्यांच्या गजरात सलाम केला. यापूर्वी मालपाणी परिवारातर्फे कोव्हिडशी मुकाबला करणार्‍या केंद्र आणि राज्य सरकारलाही प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या