नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आशिया चषक स्पर्धेच्या २८ सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. मात्र या सामन्यानंतर दुबईतील मैदानात ट्रॉफीवरुन जोरदार राडा झाला. टीम इंडियाने समाना जिंकल्यानंतर पाकिस्तानी व्यक्तीच्या हातून चषक घेणार नाही असा पवित्रा घेत मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे पारितोषिक वितरण समारंभाला नेहमी पेक्षा खूप उशीर झाला. भारताच्या या पावित्र्यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी सोबत घेऊन गेले.
पाकिस्तानचे गृह मंत्री आणि एशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यावर “ट्रॉफी चोर” अशी टीका सुरू झालीये. भारताच्या विजयानंतर नक्वी यांनी टीम इंडियाला ट्रॉफी देण्यास नकार दिला होता. संपूर्ण जगासमोर अपमानित झाल्यानंतर, पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वीने आशिया कप ट्रॉफी भारताला सादर करण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र ट्रॉफी देण्यासाठी एक अटही मोहसीन नक्वीने ठेवली आहे.
ही ठेवली अट
मोहसिन नक्वी यांनी विजेत्या टीम इंडियाला एशिया कपची ट्रॉफी आणि पदकं देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एक अट घातली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, ‘औपचारिक समारंभ’ आयोजित केला गेला तरच ते भारताला ट्रॉफी देतील. परंतु असा समारंभ होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आगामी काही दिवस ट्रॉफीवरुन वाद कायम राहण्याची शक्यता दिसून येतेय.
बीसीसीआय नक्वींविरोधात तक्रार करण्याच्या तयारीत
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी म्हटले की, आशिया चषक टीम इंडियाने जिंकला आहे तेव्हा चषक भारतात आलाच पाहिजे. आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारता येणार नाही. “पण याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती आपल्या देशाला सादर करण्यात येणारी ट्रॉफी आणि पदके त्यांच्या हॉटेलच्या खोलीत घेऊन जाईल. हे पूर्णपणे अनपेक्षित आहे, बीसीसीआय आता आयसीसीच्या पुढील बैठकीत मोहसिन नक्वी यांच्याविरोधात तक्रार करण्याच्या तयारीत आहे. कारण टीम इंडियाने पारितोषिक वितरण सोहळ्यात ट्रॉफी स्वीकारली नाही त्यानंतर ते ट्रॉफी घेऊन हॉटेलवर निघून गेले.
कोण आहे मोहसीन नक्वी?
मोहसिन नक्वी हे एशियन क्रिकेट कौन्सिलचे (एसीसी) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष आहेत. त्यासोबतच ते पाकिस्तानचे गृहमंत्री आहेत. मोहसिन नक्वी हे भारत विरोधी भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात. भारत – पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण होईल असे वक्तव्य सातत्याने करत असतात.
पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांनी मागे म्हटले होते की भारत चकचकीत मर्सिडीज आहे तर पाकिस्तान भंगारने भरलेला डंपर. याच वाक्याचा पुनरुच्चार करत भारताला धमकी देताना नक्वी म्हणाले होते की, कोणत्याही स्थितीत यांची टक्कर झाली तर गंभीर परिणाम होतील. भारतविरोधी अशा वक्तव्यामुळे नक्वी चर्चेत असतात. आता भारताने जिंकलेला चषक ते घेऊन गेल्यामुळे चर्चेत आले आहेत.
आयसीसीचा नियम काय सांगतो?
ट्रॉफी स्वीकारण्यास कर्णधाराने नकार देणे आयसीसीच्या आचारसंहितेअंतर्गत येऊ शकते, परंतु त्याबाबत कोणताही विशिष्ट नियम नाही. हे क्रिकेटच्या भावनेविरुद्ध असेल. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रॉफी का स्वीकारली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल आणि त्यानंतर स्पर्धा संस्था (ACC) किंवा ICC याबाबत निर्णय घेईल. सदर घटनेप्रकरणी कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले आहेत का आणि जर तसे असेल तर उल्लंघनांसाठी कोण जबाबदार होते आणि कोणते दंड आकारले जाऊ शकतात, याबाबत आयसीसीकडून तपास केला जाऊ शकतो.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




