मुंबई | Mumbai
गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) भरधाव ट्रकने सहा मुलांना (Child) चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात (Accident) ४ जणांचा मृत्यू (Death) झाला असून, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नागपुरच्या (Nagpur) रूग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील काटली येथे हा भीषण अपघात घडला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली आरमोरी मुख्य मार्गावरील (Aarmori Road) काटली येथील नाल्याजवळ हे सहाही जण मार्निंग वॉकसाठी गेले होते. यावेळी रस्त्यावर व्यायाम करत असतांना अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच आणखी दोघांना पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूरला रवाना करण्यात आलेले आहे.
दरम्यान, या अपघातानंतर काटली गावात शोककळा पसरली आहे. तर संतप्त गावकऱ्यांकडून (Villagers) यावेळी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजामचा प्रयत्न करण्यात आला. तसेच घटनेनंतर गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कार्य व अधिक तपास सुरू आहे.
मृतांची व जखमींची नावे
पिंकू नामदेव भोयर (वय १४) काटली, तन्मय बालाजी मानकर (वय १६) काटली यांचा जागीच मृत्यू झाला. तर दिशांत दुर्याधन मेश्राम आणि तुषार राजेंद्र मारबते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच क्षितिज तुळनिदास मेश्राम, आदित्य धनजंय कोहपते हे दोघे गंभीर जखमी आहेत.
मृतांच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत – मुख्यमंत्री
या अपघाताच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर एका अपघातात ४ युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत २ युवक जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना नागपूर येथे पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून पुढच्या १ तासात त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात येईल. मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल’, असे त्यांनी म्हटले आहे.




