मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्यातून (Beed District) जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ज्यावेळी गाडीचा अपघात झाला त्यावेळी अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले. यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने या सहा जणांना जोरदार धडक दिल्याने त्यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, या अपघातात बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी असून, त्याच्यावर
सध्या उपचार सुरू आहेत. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थाळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.
दरम्यान, ट्रकने दिलेली धडक इतकी भीषण होती की, सहाजण दूरवर फेकले गेले होते. तसेच सहा जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. तर या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ट्रक चालक (Truck Driver) ट्रकसह घटनास्थळावरुन फरार झाला आहे. त्यामुळे पोलीस या ट्रक चालकाचाही शोध घेत आहेत. या सहा जणांच्या अपघाती निधनामुळे गेवराईवर शोककळा पसरली आहे.