भरतपूर | Bharatpur
राजस्थान येथील भरतपूर जिल्ह्यात आज भीषण अपघात झाला. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू आहे. लखनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग २१ वर हंताराजवळ पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
याबाबत आधिक माहिती अशी, प्रवाशांनी भरलेली बस गुजरातमधून मथुरेकडे (उत्तर प्रदेश) निघाली होती. गुजरात राज्यातील भावनगर येथून ही बस जयपूर, भरतपूरमार्गे उत्तर प्रदेशातील मथुरेला जात होती. जयपूर-आग्रा महामार्गावरील हंतारा पुलावर असताना बसचा ब्रेक फेल झाला. त्यानंतर बसचालकाने बस बाजूला घेत ब्रेक दुरुस्ती सुरू केली. त्यानंतर मात्र मागील बाजूने येणाऱ्या ट्रकची या बसला जोरदार धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की बसमधील ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. बसमधील अन्य काही प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ६ महिला आणि पाच पुरुष आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी रुपवास भरतपूर महामार्गावर भीषण अपघात झाला होता. यावेळी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार झाले होते. हा अपघात एवढा भीषण होता की धडकेनंतर कार लांब पर्यंत फरफटत गेली. कारचा चक्काचूर झाल्याने गाडीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी त्रास झाला.