नाशिक | प्रतिनिधी Nashik
बॅलन्स शीट काय असते, वार्षिक सभा काय असते, ठेवी ठेवलेल्या पतसंस्थेची परिस्थिती कशी आहे, याची साक्षरता ठेवीदारांना आल्यास त्यांचा विश्वास हा पतसंस्थावर कायम राहील त्यामुळे संचालकांना प्रशिक्षण महत्त्वाचे आहेत मात्र त्याहीपेक्षा ठेवीदारांना प्रशिक्षण देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तथा शिखर बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केले.
जिल्ह्यातील आदर्श पतसंस्थांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढून त्यांच्या कार्याला स्फूर्ती मिळावी या उद्देशाने दैनिक ‘देशदूत’च्या वतीने व नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन, नाशिक यांच्या सहकार्याने ‘आदर्श पतसंस्था पुरस्कार २०२५’ हा शानदार सोहळा आज नाशिक-पुणे रोड येथील नासिक्लब या ठिकाणी पार पडला. याप्रसंगी अनास्कर बोलत होते.
यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था फयाज मुलानी, एम्पायर स्पाइसेस अँड फूड्स लिमिटेड चे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक हेमंत राठी, दि महाराष्ट्र राज्य अर्बन को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष सी.ए. अजय ब्रम्हेचा, नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, दै.’देशदूत’ वृत्तपत्र समूहाचे संचालक विक्रम सारडा, संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले, सल्लागार संपादक शैलेंद्र तनपुरे, जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध १५ पतसंस्थांना सन्मानित करण्यात आले. विद्याधर अनास्कर म्हणाले की, एनपीए चा जास्त विचार न करता कर्जदाराने उत्पन्न क्षम बनावे यासाठी सहकारी संस्थांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कर्जदाराच्या व्यवसायाशी संस्थांनी सतत संपर्कात राहिले पाहिजे. तळागाळातील पैसा अर्थव्यवस्थेत आणण्याचे काम पतसंस्था करत असतात. तरुणाई सहकारापासून बऱ्यापैकी अलिप्त असून तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी पतसंस्थांनी प्रयत्न करावे. केरळ सरकारने त्यांच्या कायद्यामध्ये युथ को-ऑपरेटिव्ह संकल्पना आणून त्याचे कायद्यात रूपांतर केले. सहकाराच्या दृष्टीने प्रगल्भ असलेल्या महाराष्ट्रात देखील ही संकल्पना यावी असे मत अनास्कर यांनी मांडले.
जिल्हा बँकेच्या अनुषंगाने शासन स्तरावर खूप चांगले व सक्रिय प्रयत्न सुरू आहेत. पतसंस्थांना काही अडचणी असल्यास त्यावर निश्चितपणे उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन पतसंस्थांना जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी यांनी मनोगत व्यक्त करताना दिले.
डॉ. सुनील ढिकले यांनी सहकार चळवळ कशाप्रकारे महाराष्ट्रात रुजली त्याबद्दल माहिती दिली. नाशिक जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी फेडरेशनची स्थापना दिवंगत उत्तमराव ढिकले यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. आज संपूर्ण महाराष्ट्रात फेडरेशन उत्तम कार्य करणारी संस्था म्हणून कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पतसंस्थेने तळागाळातील लोकांची परत वाढवून त्यांना सक्षम बनवले. आज या ठिकाणी सन्मान होत असलेल्या पतसंस्थाची निवड देशदूतने अगदी योग्य प्रकारे केली आहे. आज मिळालेल्या पुरस्काराने सहकारी संस्थांची जबाबदारी देखील वाढल्याचे अजय ब्रह्मेचा म्हणाले.
पुरस्कारार्थींच्या वतीने, स्वर्गीय अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रामभाऊ माळोदे, दि विजय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष राकेश चव्हाण आणि जनसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था चे अध्यक्ष तुषार बोथरा यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी प्रास्ताविकात मनोगत व्यक्त करताना सुरुवातीला सहकार चळवळीची माहिती दिली. त्या म्हणाल्या,’देशदूत’ कायमच चळवळीसोबत उभे राहिलेले दैनिक आहे. समाजात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या मागे उभे राहण्याचे काम ‘देशदूत’ नेहमी करतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित उपाध्ये यांनी केले आभार सल्लागार संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी मानले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या पतसंस्थांचा झाला सन्मान
१. स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, पिंपळगाव बसवंत
२. सहकार महर्षी त्र्यंबकराव घुगे (गुरुजी) भाग्यश्री सहकारी पतसंस्था, निफाड
३. दि विजय अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि. नाशिक
४. श्री अशोक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नाशिक
५. आर. के. सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक.
६. श्री. धनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. कळवण जिल्हा नाशिक.
७. दि. नाशिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक.
८. गोदामृत अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. सिडको, नाशिक
९. जनसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, घोटी बु.
१० श्री. महेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नाशिक
११. श्री. संत ज्ञानदेव माऊली नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नाशिक ७
१२. सुदर्शन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पंचवटी, नाशिक.
१३. नासिकरोड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नाशिक रोड
१४. यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कळवण
१५. विनता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. वडाळीभोई ता. चांदवड जि. नाशिक
दीड वर्षात जिल्हा बँक उर्जीतावस्थेत येणार
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती विद्याधर अनासकर यांनी दिली. सर्व शेतकरी संघटना व शेतकऱ्यांसोबत जिल्हा बँकेच्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी आपण बैठक घेतली असून त्यांचे म्हणणे समजून घेतले आहे. शासन स्तरावर आपण याविषयी भूमिका मांडली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेवर संस्थात्मक सल्लागार म्हणून निवड होणार आहे. जिल्हा बँकेत अडकलेल्या ठेवी या संपूर्णतः सुरक्षित राहील अशी हमी अनास्कर यांनी कार्यक्रमात दिली. जिल्हा बँकेला लागणारी सर्व लिक्विडिटी पुरवण्याचे काम राज्य शिखर बँकेने मंजूर केले आहे. दीड वर्षाच्या आत सर्व पतसंस्थांना जिल्हा बँकेत अडकलेले पैसे हे परत मिळतील. अडकलेल्या पैशांची हमी सरकारकडून घेतली जाईल. असे सुतोवाच त्यांनी यावेळी केले. या हमीच्या बळावर पतसंस्थांना इतर ठिकाणाहून कर्जपुरवठा केला जाईल.