मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्यावर शिवसेना आणि मनसे पक्षातील उपनेते हे सकारात्मक असल्याच्या प्रतिक्रिया देत आहे तर दोन्ही पक्षातील कार्यकर्ते कार्यक्रमांदरम्यान एकत्र आल्याचेही पहायला मिळत आहे. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत आम्ही एकत्र येण्यास तयार आहेत”, असे ते म्हणाले. तसेच सत्ताधारी भाजपकडून महाराष्ट्रावर अन्याय होत असून ते मुंबईसह राज्याला गिळवून टाकतील, असाही त्यांनी आरोप केला.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “अदानी समूह असेल किंवा भाजपा असेल हे मुंबई आणि महाराष्ट्र गिळंकृत करायला निघालेले आहेत. मात्र, अनेक अत्याचाराच्या घटना या महाराष्ट्रात होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी जे कोणते पक्ष लढत आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याची सर्वात जास्त चर्चा आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी काम करण्यास तयार असलेल्या कोणत्याही पक्षासोबत, आम्ही काम करण्यास तयार आहोत, हे आम्ही सातत्याने सांगत आलो आहोत. बदल घडवून आणण्याची आमची जबाबदारी आहे. महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या कोणत्याही पक्षाने एकत्र येऊन लढले पाहिजे.”
उध्दव ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र कधी येणार का? यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, “ठीक आहे, बघुया, जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल. मी तुम्हाला फक्त संदेश नाही तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये काहीही संभ्रम नाही. त्यामुळे माझे म्हणणे असे आहे की संदेश वैगेरे देण्यापेक्षा जी काही बातमी द्यायची ती आम्ही देऊ”, असे सूचक भाष्य उद्धव ठाकरे यांनी केले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा