राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या राहुरी येथील आढाव दाम्पत्य खून खटल्यातील माफीचा साक्षीदार झालेल्या एका आरीपीला काल दि. 5 मे रोजी अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आला. जामीनमध्ये काही नियम अटी घालण्यात आल्या आहेत. या खून खटल्याचा येत्या पाच ते सहा महिन्यात निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अॅड. राजाराम जयवंत आढाव, वय 52 वर्षे, व त्यांची पत्नी अॅड. मनीषा राजाराम आढाव, वय 42 वर्षे, रा. मानोरी, ता. राहुरी हे वकिल दाम्पत्य दि. 25 जानेवारी 2024 रोजी राहुरी येथील न्यायालयात त्यांचे कामकाज करत होते. दुपारच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी न्यायालय परिसरातून अॅड. आढाव दाम्पत्याचे पाच लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना उघडकीस आली होती.
त्यानंतर अॅड. आढाव दाम्पत्याचा पाच ते सहा तास छळ करुन त्यांची निर्घृण हत्या केली होती. पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेऊन राहुरी तालुक्यातील उंबरे येथील स्मशान भूमीत असलेल्या विहिरीतून अॅड. आढाव दाम्पत्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. अॅड. मनीषा आढाव यांची बहिण लता राजेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग, रा. उंबरे, भैय्या ऊर्फ सागर साहेबराव खांदे, रा. येवले आखाडा, शुभम संजित महाडिक, रा. मानोरी, हर्षल दत्तात्रय ढोकणे, रा. उंबरे, बबन सुनील मोरे, रा. उंबरे या पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर हर्षल दत्तात्रय ढोकणे या दुहेरी हत्याकांडात माफीचा साक्षीदार झाला. सदर खून खटल्याची सुनावणी अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयात सुरु झाली.
दरम्यान या घटनेतील साक्षीदार, पंच, तपासी अधिकारी यांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. तसेच हर्षल ढोकणे याचा जामीन अर्ज न्यायालयासमोर ठेवण्यात आला. त्यावर सुनवाई होऊन दि. 5 मे 2025 रोजी प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांनी अॅड. आढाव दाम्पत्य खून खटल्यात माफिचा साक्षीदार झालेला आरोपी हर्षल दत्तात्रय ढोकणे, रा उंबरे, ता. राहुरी, याचा जामीन मंजूर केला. अॅड. आढाव दाम्पत्य खून खटल्याचा निकाल येत्या पाच ते सहा महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.