मुंबई | प्रतिनिधी Mumbai
भाजपच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजप महायुतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली, परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ३ मार्च रोजी काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी येथे दिली. तसेच महापालिका क्षेत्रातील विकास कामे ठप्प पडल्याच्या विरोधात ४ मार्चला महापालिका क्षेत्रात आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी आज टिळक भवन येथे पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी पक्षाच्या वतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली. राज्यातील भाजप युतीचे सरकार शेतकरी विरोधी आणि भांडवलदारधार्जिणे आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भावात ४ हजार रुपये क्विंटलने सोयाबीन विकावे लागत आहे. कांदा, हरभरा, कापूस या पिकांनाही भाव नाही. आता शेतकऱ्याची तूर बाजारात येत आहे, तर केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियातून तूर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्याच्या तुरीला भाव मिळणार नाही. शेतकऱ्यांच्या आजच्या स्थितीला सरकार जबाबदार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष ३ मार्च रोजी राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयी राज्यभर आंदोलन करून सरकारला जागे करण्याचे काम केले जाणार आहे, असे सपकाळ म्हणाले.
राज्यात तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. तारीख पे तारीख आणि सत्ता आपल्या खिशात असा खेळ सुरु आहे. मुख्यमंत्र्यांना राज्यातील आणि केंद्रात पंतप्रधानांना सर्व सत्ता हाती हवी आहे. यामुळे सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या धोरणाला भाजप सरकारने हरताळ फासला आहे. मुदत संपूनही निवडणुका घेतल्या नसल्याने नगरसेवकांच्या मार्फत जनतेची जी कामे होत होती ती आता होत नाहीत. या पार्श्वभूमीवर ४ मार्च रोजी महानगरपालिका क्षेत्रात आंदोलन करून काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.