नाशिक । प्रतिनिधी Nashik
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘चला जाणूया नदीला ‘या अभियानात गोदावरी नदीला ( Godavari River )वगळल्याने तीव्र संताप व्यक्त करुन रामकुंडावर ( Ramkund) आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील संपूर्ण 75 नद्या उपनद्या यांचे जलअमृत व्हावे, यासाठी नदीयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. व चला जाणूया नदीला या अभियानात नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच उपनद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. परंतु पवित्र अशा व दर बारा वर्षांनी कुंभमेळा होणार्या गोदावरी (गंगेचा)नदीचा समावेश या नदी यात्रेच्या यादीमध्ये केलेला नाही, याबाबत सातत्याने प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही अद्यापही या शासन व प्रशासनाने गोदावरी नदीचा समावेश त्यांच्या जीआरमध्ये सरकारी अध्यादेशामध्ये केलेला नाही.
म्हणून शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व साधू, महंत, पुरोहित संघ, सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी व पर्यावरणप्रेमी यांनी शासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करत गोदावरी नदी गंगाघाटावरील रामकुंडावर आत्मक्लेश करण्यात आले.
यात महंत भक्तीचरदास महाराज, महंत राजाराम महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ला, आयोजक निशिकांत पगारे, काँ. राजू देसले, एनजीओ फोरमचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, राजू शिरसाठ, नंदिनी नदीचे प्रा. सोमनाथ मुठाळ, वरूणा नदीचे सुनील परदेशी, राहुल जोरे, वीरेंद्र टिळे, रोहित कानडे, आळंदी नदीचे तुषार पिंगळे, प्रभाकर वायचळे, पत्रकार सुरेश भोर, डॉ. अजय कापडणीस, योगेश कापसे, जगबिर सिंग, सुरेंद्र बोरसे, वैशाली चव्हाण, भारती जाधव व मंगला पिसे उपस्थित होते. पंचवटी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून दिले.