समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कायदे केले जातात पण फक्त कायदे करणे पुरेसे आहे का? केवळ कायदे करून नेत्यांची जबाबदारी संपते का? कायदयाचा धाक निर्माण करण्याची जबाबदारी कोणाची? असे अनेक प्रश्न ’ सुदाम मुंडे ’ प्रकरणाने उपस्थित केले आहेत.
महाराष्ट्र राज्यात तर्हेतर्हेने दशकापूर्वी गाजलेले हे कुप्रसिद्ध नाव ! बीड जिल्ह्यातील एक स्त्रीभ्रूण हत्या प्रकरण दहा वर्षांपूर्वी उजेडात आले. त्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले होते. डॉ. सुदाम आणि त्याची डॉ. पत्नी वर्षानुवर्षे स्त्रीभ्रूणहत्या करत होते. हे प्रकरण उघडकीला येईपर्यंत त्यांनी हजारो भ्रूणांचे जीव घेतले होते. डॉक्टरीसारख्या उदात्त पेशा (नोबल प्रोफेशन) ला, माणुसकीला आणि संवेदनशीलतेला या डॉक्टर जोडप्याने काळिमा फासला. या प्रकरणी मुंडे जोडप्याला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली होती.
दरम्यानच्या काळात मुंडेची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा स्त्रीभ्रूणहत्येच्या कारनाम्यांना सुरुवात केली होती. याची कुणकुण लागल्यानंतर प्रशासनाने त्याच्या दवाखान्यावर छापा टाकला आणि तेथील सर्व साहित्य दुसर्यांदा जप्त केले. जामिनावर सुटलेला मुंडे आपले समाजविघातक काम बिनभोभाट सुरु करू शकतो हे अनेकांच्या सहकार्याविना शक्य झाले असावे का? या घटनेचा बहुआयामी परामर्श घेतला जायला हवा. वैद्यकीय परवाना रद्द केला गेलेल्या या गुन्हेगार प्रवृत्तीच्या डॉक्टर दांपत्याला वैद्यकीय व्यवसाय इतक्या सहजपणे सुरु करणे कसे शक्य झाले?
कोणाकोणाचा वरदहस्त त्याकामी लाभला असेल? पहिल्यांदा जेव्हा हे प्रकरण उघडकीला आले तेव्हा राज्यभर आंदोलने झाली होती. ठिकठिकाणी मोर्चे निघाले होते. तरीही तो आपले उद्योग पुन्हा सुरु कसे करू शकला? डोक्यावर कोणाचा तरी हात असल्याशिवाय मुंडे हिंमत करू शकेल का? आपण काहीही केले तरी आपल्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही, अटक झाली तरी आपली सुटका होणारच असा विश्वास मुंडेसारख्या अट्टल गुन्हेगारांना का वाटतो? मुंडेच नव्हे तर अशा प्रकारणांमध्ये संशयाची सुई नेत्यांकडे आणि यंत्रणेकडे दिशा दाखवते हे नाकबूल करता येईल का? एरवी साध्या दाखल्यांसाठी जनतेची अडवणूक केली जाते.
पण मुंडेंकडे मात्र लक्ष जात नाही की ठरवून दुर्लक्ष केले जाते? अशा घटनांची जनतेत चौकाचौकात चर्चा सुरु असते. पण ती यंत्रणेच्या कानावर मात्र जात नाही हे कोणाला तरी पटू शकेल का? काहींना प्रस्थापित होण्यासाठी आडनावे मदत करतात. तसे काही सुदामच्या बाबतीत घडले का? मुंडे जामिनावर सुटला होता.
याआधीही बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये जामिनावर सुटलेल्या गुन्हेगार पुन्हा एकदा तेच गुन्हे करताना पकडले गेले आहेत. जामीनावर सुटलेले गुन्हेगार त्या काळात काय करतात? कुठे जातात? याची नोंद ठेवली जाते की नाही? तशी ती ठेवली जात नसेल तर गुन्ह्यांना आळा घालण्यातील ही फार मोठी उणीव वर्षानुवर्षे का कायम ठेवली जाते? कायद्यातील अशा अनेक पळवाटा गुन्हेगारांना मदत करतात.
अंगवळणी पडलेले गुन्हे पुन्हापुन्हा करत राहण्याची मोकळीकही देतात इतकेच नव्हे तर संसदेत व विधानसभेतही नेऊन बसवतात. त्यापुढे मुंडेसारख्यांच्या व्यवसायाचे काय बोला? यात समाजही तितकाच दोषी मानला जायला हवा. मुंडे याच्या दवाखान्यावर छापा टाकला तेव्हा तेथे चार रुग्ण उपचार घेत होते. मुंडे स्त्रीभ्रूण असलेले गर्भ मारून टाकतो हे लोकांना माहित नाही का? समाजात मुलींची संख्या कमी होत असल्याचे भीषण परिणाम समाजाला भोगावे लागत आहेत.
तरीही मंडेला रुग्ण कसे मिळतात? भारताच्या स्वातंत्र्याविषयी ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान चर्चिल यांनी अत्यंत प्रतिकूल मते ब्रिटिश पार्लमेंटमध्ये व्यक्त केली होती. भारताला स्वातंत्र्य दिल्यास थोड्याच दिवसात तेथे समाजात गुंडपुंड प्रवृत्ती धुडगूस घालतील. असेही त्यांनी नमूद केले होते. चर्चिल यांचे ते मत चुकीचे ठरू नये असा चंग काही भारतीयांनी बांधला असावा का? भारतीय राजकारणाला आलेले सध्याचे ओंगळ स्वरूप लक्षात घेता ती शक्यता कशी नाकारावी?