Thursday, May 15, 2025
Homeअग्रलेखलोक विधायक दृष्टिकोन स्वीकारत आहेत !

लोक विधायक दृष्टिकोन स्वीकारत आहेत !

जनतेच्या दैनंदिन जीवनाशी काडीमात्र संबंध नसलेल्या विषयांचा उहापोह माध्यमांच्या मदतीने घडत राहावा, लोकांचे लक्ष त्यांच्या दैनंदिन अडचणींपासून दूर जावे या हेतूने माध्यमांमध्ये अनेक विषयांवरून कलगीतुरा रंगला आणि रंगवला जातही आहे.

- Advertisement -

बॉलिवूडचे राजकीय कनेक्शन, करोना, काही जिल्ह्यामध्ये झालेला अतिरिक्त पाऊस, केंद्र सरकारने संमत केलेली तीन विधेयके, नेते घेत असलेली राज्यपालांची भेट अशा अनेक मुद्द्यांवरून राजकीय वातावरण ढवळले जात आहे. त्या बळावर जनतेचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होत आहोत असा नेत्यांचा आणि काही बॉलिवूडमधील कलाकारांचा भ्रम वाढावा असेच हे वातावरण आहे. जनतेचे रोजच्या जगण्याचे प्रश्न वेगळे आहेत.

लोक नसत्या राजकीय उठाठेवीना कंटाळले आहेत. सुजाण लोक आता त्यांचे लक्ष विधायक कामांकडे वळवत आहेत. अशा कामांना आपापल्या परीने यथाशक्ती सहकार्य करून लोक पाठबळ देत आहेत. करोना साथीच्या सुरुवातीच्या काळात रुग्णालयांनी करोनाच्या रुग्णांवर उपचारांनाच प्राधान्य दिले होते. सामान्य रुग्णांवर उपचार करण्याला प्राथमिकता दिली जात नव्हती अशा तक्रारी अधूनमधून माध्यमात झळकत होत्या.

सामान्य रुग्णांना उपचारांची गरज भासत नाही का? रक्तदाब, मधुमेहग्रस्त रुग्णांना उपचारांची गरज भासत नाही का? असे प्रश्नही उपस्थित केले जात होते. मात्र याच काळात गेल्या चार महिन्यात टाटा कॅन्सर रुग्णालयात 1600 पेक्षा जास्त कॅन्सर रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या गेल्या.

रुग्णालयात दाखल होणार्‍या अनेक कर्करुग्णांनाही करोनाची लागण आढळली. रुग्णालयाने या समस्येवर देखील मात केली. उपचारांची क्षमता वाढवली आहे. लॉकडाउनच्या काळात लोकांना घरात सक्तीने बसवून सरकारने जबाबदारी पार पाडल्याचा गाजावाजा सुरु ठेवला.

शहरी भागात विविध ठिकाणी काम करणारे कामगार आणि लोक आपापल्या गावी परतले होते. कारखाने बंद होते. वाहतुकीवर अमर्याद बंधने होती. म्हणून रोजगार हरपलेले कामगार हात चोळीत बसले होते. अशा काळात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका प्रशासनाने 80 पेक्षा जास्त तलावातील गाळ उपसला. या उपसा उपक्रमामुळे तलावांची पाण्याची साठवण क्षमता तर वाढलीच पण शेकडो लोकांना तात्पुरता रोजगारही मिळाला.

करोनाचा कहर आणि दहशत मात्र वाढत आहे. आपल्याला करोना तर होणार नाही ना या भीतीने लोक अस्वस्थ आहेत. मानसिक आजार वाढत आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे यांनी ’चांगुलपणाची चळवळ’ हा अभिनव उपक्रम ऑनलाईन सुरु केला आहे. ज्ञानेश्वर मुळे परराष्ट्र सचिव होते. अनेक देशात राजदूत होते. ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्यही आहेत. या उपक्रमात रोज सायंकाळी 1 तास वेबिनार घेतला जातो. अनेक मान्यवर मंडळी लोकांशी हितगुज करतात. या उपक्रमाचे 135 पेक्षा जास्त भाग प्रसारित झाले आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार सुप्रिया सुळे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश लोकूर अशा अनेक दिग्गज मंडळींनी आपापले अनुभव प्रेक्षकांना सांगितले. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात अनेक संस्था अडचणीत आल्या. त्यांच्या मदतीसाठी लोकांनी मदतीचा हात पुढे केला. काही व्यक्ती, संस्था दीर्घकाळ कार्यरत राहतात. कोणत्याही प्रकारचा गवगवा न करता शांतपणे आपले काम करत राहातात.

अबोलपणे कार्य करत असूनही लोकांचे सहकार्य त्यांना मिळत आहे. कारण राजकारणाच्या नादी लागून फक्त कालापव्यय होईल, पण जनतेच्या पदरात फारसे काही पडणार नाही हे आता सामान्यांना सुद्धा उमगले आहे. ग्रामीण जनता ते लवकर ओळखू शकली.

त्यामुळे जनतेनेही आता शांतपणे आपले दिनक्रम सुरु केले आहेत. समाजजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लोक शहाणे तर दिशाभूल करणारे नेत्यांचे उपद्व्याप जनतेच्या रचनात्मक दृष्टिकोनाने नगण्य होत जातील. वर उल्लेख केलेली उदाहरणे हे त्याचेच नमुने आहेत. अन्यत्रही त्यांचे अनुकरण वाढत जाईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढणार का?...

0
पुणे | Pune  काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार माहिन्यात घ्या, असे आदेश दिले होते. न्यायालयाच्या (Supreme Court) या...