अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बियाणे, खते व कीटकनाशकांच्या निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणाच्या अनुषंगाने तालुकास्तरावर असणार्या कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीत फेररचना करण्यात आली आहे. आता या समितीत महाबीज कंपनीचे प्रतिनिधी सदस्य असणार असून या समितीचे सदस्य सचिव म्हणून तालुकास्तरावरील गुणनियंत्रक हे काम पाहणार आहे. पूर्वी पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी यांच्या नियंत्रणात हे काम पाहण्यात येत होते.
याबाबतचे आदेश राज्य सरकारच्या कृषी विभागाच्यावतीने काढण्यात आले आहेत. यात राज्यात कृषी उत्पादन व उत्पादकता वाढविण्यामध्ये दर्जेदार कृषी निविष्ठांची वेळेवर उपलब्धता होणे आवश्यक आहे. तसेच शेतकर्यांना उपलब्ध होत असलेले बियाणे, खते, किटकनाशके आदी यात भेसळ, त्यांचा दर्जा योग्य आवश्यक आहे. अलिकडच्या काळात कृषी निविष्ठांबाबत शेतकर्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींची गंभरपणे दखल घेणे आवश्यक आहे. कृषी निविष्ठांबाबत येणार्या तक्रारीपैकी बहुतांशी तक्रारी या तालुकास्तरावरील असतात.
या तक्रारींची वेळे दखल घेण्यासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली होती. मात्र, या समितीत बदल करण्याच्या सुचना कृषी आयुक्त यांनी केल्या. त्यानूसार या समितीत बदल करण्यात आले आहेत. या समितीत संंबंधीत उपविभागाचे कृषी अधिकारी हे पूर्वी प्रमाणे अध्यक्ष राहणार असून या समितीत संबंधीत तालुक्याचे कषी अधिकारी सदस्य, कृषी विद्यापिठ- कृषी संशोधन केंद्र अथवा कृषी विज्ञान केंद्राची प्रतिनिधी यांच्यासह महाबील या कंपनीचे प्रतिनिधी व तालुकास्तरावरील कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.ही समिती तक्रार आल्यानंतर आठ दिवसात संबंधीत कृषी निविष्ठांची तापसणी करणार असल्याचे आदेश कृषी विभागाचे उपसचिव संतोष कराड यांनी काढले आहेत.




