मुंबई | Mumbai
राज्यात मे महिन्यातच मान्सून पूर्व आणि अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे देखील शेतीचे झालेले नुकसान पाहणीसाठी विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहे. त्यातच गुरवारी त्यांच्या मतदार संघ असलेल्या सिन्नर तालुक्यात असताना शेती नुकसानीबद्दल बोलून गेले आहे. “हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा, द्राक्षांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कृषी मंत्र्यांचे हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे ठरलेय. त्यांच्या या विधानामुळे ते पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे.
हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवाल त्यांनी शेतकऱ्यांना केला. कोकाटेंनी केलेल्या या विधानामुळे विरोधकांना आयते कोलीतच मिळाले आहे.
नेमके काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
यावेळी पत्रकारांशी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी वक्तव्य केले आहे. पत्रकारांनी कृषीमंत्र्यांना नुकसानी संदर्भात विचारले असता नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली. तर शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहेत, असे विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? जे कांदे वावरात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले, त्यांचे पंचनामे होणार नाहीत. त्याचे पंचनामे करणे अवघड आहे. ते नियमात बसत नाही, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, शेतात जी काही पिके असतील त्यांचे रीतसर पंचनामे केले जातील असेदेखील माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले.
महिनाभरापुर्वी केले होते वादग्रस्त वक्तव्य
महिनाभरापूर्वी कोकाटे यांनी शेतकऱ्यांना ‘भिकारी’ म्हणत, कर्जमाफीची रक्कम लग्नासाठी खर्च केली जाते, असा गंभीर आरोप केला होता. त्यावेळी त्यांना विरोधकांनी धारेवर धरले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोकाटेंच्या विधानावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. आज कोकाटेंनी केलेल्या नव्या वादग्रस्त विधानामुळे ते पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर येण्याची शक्यता आहे. त्यांच्या या विधानाचा विरोधक कसा समाचार घेणार हे लवकरच समजेल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा