अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करून कृषी योजनांचा शेतकर्यांना तातडीने लाभ देण्यासाठी ‘अॅग्रीस्टॅक’ योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या माहितीमधून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याने शेतकर्यांनी नोंदणीसाठी नजिकच्या सीएससी केंद्र, आपले सरकार केंद्र, सेतू केंद्र येथे जाऊन आपली आधार जोडणी विनामूल्य करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले आहे.
शेतकर्यांना शेतातील हंगामी पिकांची आणि जमीन नकाशांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कृषी योजनांसाठी ‘अॅग्रीस्टॅक’ कार्डसाठी नोंदणी सुरू केली आहे. अॅग्रीस्टॅकव्दारे शेतकर्यांचा डेटा एकत्रित केला जाणार असून त्याआधारे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करून कृषी योजनांचा शेतकर्यांना लाभ होणार आहे. एकत्रित डेटाच्या आधारे विविध शेतीविषयक माहिती मिळाल्याने शासनाला त्वरित निर्णय घेणे सुलभ होणार आहे. तसेच जे लाभार्थी आणि गरजू शेतकरी आहेत, त्यांना वेळेवर मदत मिळण्यासाठी याचा उपयोग होईल.
या प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन योजना सुरू करण्यासाठी शेतकरी संख्या आणि पिकांची आकडेवारी शासनाला तातडीने उपलब्ध होईल. शेतकरी आणि कृषी योजनांची आखणी करणे, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरीय समितीची निर्मिती करण्यात आली असून प्रत्येक गावामध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक हे नोंदणी करणार आहे.
जिल्ह्यात एकूण 3 हजार 314 सीएससी सेंटर असून अकोले तालुक्यात 160 सीएससी सेंटर आहेत. जामखेड 179, कर्जत 236, कोपरगाव 229, अहिल्यानगर 325, नेवासा 354, पारनेर 236, पाथर्डी 228, राहाता 206, राहुरी 205, संगमनेर 314, शेवगाव 260, श्रीगोंदा 192 तर श्रीरामपूर तालुक्यात 190 सीएससी सेंटर आहेत.