अहिल्यानगर । प्रतिनिधी
दारु पिऊन शिवीगाळ केली म्हणून डोक्यात दगड घालून तरुणाचा खून केल्याची घटना शनिवारी(ता.11) सकाळी एमआयडीसीमध्ये घडली. अश्विन मारुती कांबळे (36, मूळ रा. जत्राड, निपाणी, बेळगाव, सध्या रा. गणेशनगर, नागापूर, अहिल्यानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी भास्कर विठ्ठल देशमुख (वय 37, रा.वाळूंज, जिल्हा अहिल्यानगर) या संशयित आरोपीला अटक केली आहे.
अश्विन कांबळे हा एमआयडीसीमधील एका कारखान्यात काम करीत होता. शहरातील बोल्हेगाव फाटा परिसरातील स्वराज ट्रॅक्टर दालनाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका मोकळ्या जागेत शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास मृतदेह आढळला. या घटनेचा तपास सुरु असताना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी वेलतूरी (ता. आष्टी, जि. बीड) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार पोलीस पथकाने आरोपीला वेलतूरी येथून अटक केली.