अहिल्यानगर (प्रतिनिधी)
प्रेमसंबंधातून तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव केल्याची घटना अहिल्यानगर तालुका पोलिसांच्या तपासातून उघडकीस आल्यानंतर अपघाताचा गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणात खून, कटकारस्थान आणि बनाव या गंभीर कलमांची नोंद करण्यात आली होती.
यामध्ये शुक्रवारी अॅट्रॉसिटीचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. दरम्यान, सुरूवातीला पोलिसांनी दोघांना अटक केली होती. गुरूवारी रात्री आणखी दोघांना अटक केली. अटकेतील चौघांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची (10 जूनपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना 30 मे रोजी सायंकाळी टाकळी काझी (ता. अहिल्यानगर) शिवारातील हॉटेल रायबा समोर घडली. आदेश नंदू घोरपडे (वय 22, रा. कायनेटिक चौक, अहिल्यानगर) हा तरूण आणि त्याचा मित्र मोहित संतोष निमसे (वय 20, रा. रंगोली चौक, केडगाव) दुचाकीवरून नगरच्या दिशेने येत असताना समोरून आलेल्या पिकअपने जोरदार धडक दिल्यामुळे घोरपडे याचा मृत्यू झाला होता.
मोहित निमसे याने या प्रकरणी 2 जून रोजी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात पिकअप चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मृत घोरपडेच्या आईने हा अपघात नसून तिच्या मुलाचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलून अधिक सखोल चौकशी केली असता, ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले.
मृत तरूणाच्या प्रेमप्रकरणातून सूड घेण्यासाठी ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. तालुका पोलिसांनी विश्वजीत सुभाष पोटे (वय 25) आणि संकेत बाळासाहेब बंडाले (वय 27, दोघे रा. दादेगाव) यांना सुरूवातीला अटक केली होती. ते पोलीस कोठडीत होते.
दरम्यान, या गुन्ह्यात वाढीव कलम लावण्यात आल्याने गुन्ह्याचा तपास नगर ग्रामीणचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्याकडे गेला आहे. त्यांनी आणखी दोघांना अटक केली. अमरसिंह सुभाष पोटे व धनंजय सुभाष फुंदे (दोघे रा. दादेगाव) अशी त्यांची नावे आहेत. चौघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.