अहिल्यानगर (प्रतिनिधी)
जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या मागील आठवड्यात बदल्या करण्यात आल्यानंतर आता पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी परिक्षेत्रातील पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच काढल्याने जिल्ह्याबाहेर अनेक पोलीस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत तर नव्याने काही अधिकारी जिल्ह्यात बदलून आले आहेत.
दरम्यान, कोपरगाव शहर, शिर्डी वाहतुक शाखा, शेवगाव, कर्जत येथील प्रभारी अधिकार्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाल्याने तेथे नवीन अधिकारी दिले जाणार आहे. याशिवाय नेवासा पोलीस ठाण्याचा कार्यभार प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षकांकडे असल्याने तेथेही नवीन प्रभारी अधिकारी दिले जाणार आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे याबाबतचे आदेश लवकरच काढणार आहेत.
महानिरीक्षक कराळे यांनी परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच काढले. त्यांनी विनंती व प्रशासकीय अशा दोन्ही प्रकारच्या बदल्या केल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील अधिकार्यांच्या बाहेरच्या जिल्ह्यात बदल्या झाल्या आहेत. तसेच जिल्ह्यात नवीन अधिकारी बदलून आले आहेत. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भगवान मथुरे यांची नाशिक ग्रामीण, शिर्डी वाहतुक शाखेचे प्रभारी प्रदीप देशमुख यांची जळगाव, शेवगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी समाधान नागरे यांची नाशिक ग्रामीण व नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले यशवंत बाविस्कर यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाली आहे.
तसेच पोलीस महासंचालक यांनी केलेल्या बदलीमध्ये कर्जत ठाण्याचे प्रभारी दौलत जाधव यांची पिंपरी चिंचवड (पुणे) येथे बदली झाली आहे. त्यामुळे कोपरगाव शहर, शिर्डी वाहतुक शाखा, नेवासा, शेवगाव, कर्जत येथे नवीन प्रभारी अधिकारी दिले जाणार आहे. याबाबतचे आदेश अधीक्षक घार्गे काढणार आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीण येथून यशवंत धनवडे, जळगाववरून किरणकुमार कबाडी व नंदुरबार येथून जगदीश भांबळ हे तीन निरीक्षक जिल्ह्यात बदलून आले आहेत.
तसेच महानिरीक्षक कराळे यांनी परिक्षेत्रातील सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या देखील बदल्या केल्या आहेत. नगरवरून बदलून गेलेले सहायक पोलीस निरीक्षक व कंसात बदली ठिकाण – संदीप परदेशी, अमोल पवार व योगिता कोकाटे (नाशिक ग्रामीण), विवेक पवार, रामेश्वर कायंदे (धूळे), सुरेश आव्हाड (जळगाव) व विश्वास भान्सी (नंदुरबार). तसेच जिल्ह्यात पूर्वी काम केलेले व वर्षभरापूर्वीच निवडणुकीच्या आधी बदलून गेलेले शिशिरकुमार व पल्लवी देशमुख हे दोघे पती- पत्नी जिल्ह्यात पुन्हा बदलून आले आहेत. ते नाशिक ग्रामीण येथे कार्यरत होते. याशिवाय जळगाव येथून अनिल मोरे व गणेश धुमाळ यांची नगर जिल्ह्यात बदली झाली आहे.
नगर जिल्ह्यातून बाहेर बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक व कंसात बदली ठिकाण – सज्जन नार्हेडा, सचिन रणशेवरे, विजय भोंबे (जळगाव), किरण साळुंके, सुरेखा देवरे, देविदास भालेराव, अमोल गायधनी, रमेश पाटील, अशोक मोकळ, शैलेश पाटील (नाशिक ग्रामीण), तर चौघांना जिल्ह्यात एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये तुषार धाकराव, तुळशीराम पवार, मनोज मोंढे व प्रियंका आठरे यांचा समावेश आहे. तर बाहेरून नगर जिल्ह्यात बदलून आलेले उपनिरीक्षक पुढील प्रमाणे – नाशिक ग्रामीण येथून अर्चना तोडमल, आजिनाथ कोठाळे, प्रवीण उदे, अजय कौटे, आप्पासाहेब हंडाळ, रामहरी खेडकर, बाजीराव सानप, भरत धुमाळ, किशोर गावडे व जळगाव मधून सुदाम काकडे, सागर काळे, राजू जाधव, परशुराम दळवी, गणेश वाघमारे व प्रदीप बोरूडे यांचा समावेश आहे.
परिक्षेत्रात बदली झालेल्या पोलीस अधिकार्यांना लवकरच कार्यमुक्त केले जाईल व तेथे नवीन अधिकारी देण्यात येतील. अधिकार्यांच्या बदल्या बाबत लवकरच आदेश काढण्यात येईल.
– सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक.
कार्यकाळ पूर्ण झालेल्यांची होणार बदली
याशिवाय ज्या पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकार्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा प्रभारी अधिकार्यांची अन्य ठिकाणी बदली करून तेथे नवीन प्रभारी अधिकारी दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अधीक्षक घार्गे यांनी पदभार घेताच बदल्यांच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे अनेक प्रभारी अधिकार्यांची बदली होणार आहे.
नगर ग्रामीण, कर्जत विभागाला मिळणार नवीन उपअधीक्षक
नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले व कर्जत विभागाचे पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वखारे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. या दोन्ही ठिकाणी आता नवीन उपअधीक्षक नियुक्त केले जाणार आहेत. याबाबतचे आदेश राज्याच्या गृह विभागाकडून काढले जाणार आहेत.