भंडारदरा, कोतूळ (वार्ताहर)
उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, उद्योगाला चालना देणाऱ्या भंडारदरा आणि मुळा धरण पाणलोटात श्रावणसरींनी जोर धरल्याने धरणात पाण्याची आवक वेगाने होऊ लागली आहे.
पाणलोटात गत आठ दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला होता. पण काल शुक्रवारी सकाळपासूनच पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने डोंगरदऱ्यांमधील धबधबे जोमाने सक्रिय झाले असून ओढेनाले भरभरून वाहत धरणात विसावत आहेत. परिणामी धरणाची पातळी वाढू लागली आहे. ११०३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात काल सायंकाळी ८८९१ दलघफू (८०.५४ टक्के) पाणीसाठा झाला होता.
पाऊस सुरूच असल्याने नियमानुसार जुलै अखेर ८५ टक्के पाणीसाठा झाल्यावर पाण्याचा विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. दिवसभर पाऊस असल्याने कालच्या आठवडा बाजारात शुकशुकाट जावणत होता. पाऊस सुरू झाल्याने काही भागात भात आवणीच्या कामाने वेग घेतला आहे.
तर गत आठवड्यात जोरदार पाऊस कोसळल्याने भात रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. निळवंडेतही पाण्याची आवक होऊ लागली आहे. काल सायंकाळी ७२६९ दलघफू पाणीसाठा होता. या धरणातून १५७० क्युसेसने विसर्ग सुरू आहे. आढळा पाणलोटातही पाऊस सुरू असल्याने या धरणात ९ दलघफू पाण्याची आवक झाली.
कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा पाणलोटातील हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनई व अन्य भागात श्रावणसरी जोरदार बरसू लागल्याने मुळा नदीतील पाणी तासागणिक वाढु लागले आहे. काल सायंकाळी कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग १५१० क्युसेक होता. रात्री पाऊस वाढल्याने काल शुक्रवारी सकाळी तो ३२१२ क्युसेक झाला होता.
दिवसभर पावसाचा जोर आणखी वाढल्याने सायंकाळी नदीतील कोतूळ येथील विसर्ग ८३७३ क्युसेस होता. त्यामुळे धरणतील पाणीसाठा १९५६० दलघफू झाला होता. रात्री उशीरापर्यंत पावसाचा जोर टिकून होता. पावसाचा जोर वाढल्यास या धरणांमधून विसर्ग वाढविण्यात येण्याची शक्यता आहे.





