अहिल्यानगर ( प्रतिनिधी)
पंचायत राज व्यवस्थेचे सर्वोच्च पद असणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदावर १९६२ पासून २०२२ पर्यंत गेल्या ६० वर्षांत चार महिला सदस्यांना पाचवेळा नेतृत्व करण्याची संधी मिळाली. यात सर्वात भाग्यवान शालीनीताई विखे पाटील ठरल्या. त्यांना अलिकडच्या २० वर्षात दोनदा अध्यक्षपदाची संधी मिळाली. आता पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे महिलेसाठी तेही अनुसूचित जमातीसाठी राखीव निघाले आहे. यामुळे या ठिकाणी कोणाला संधी मिळणार ? याकडे राज्याचे लक्ष राहणार आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये सर्वात मोठी राजकीय परंपरा असणारी जिल्हा परिषद म्हणून नगर जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम केलेल्या नेतृत्वाने पुढील काळात लोकसभा आणि विधानसभेत काम केलेले आहे. यामुळे खऱ्याअर्थाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही कार्यकर्ते घडवणारी राजकीय संस्था ठरलेली आहे. या ठिकाणी गेल्या २५ वर्षांपासून अधिक काळ अध्यक्षपद हे आरक्षीत निघालेले नव्हते. यामुळे यंदा जिल्हा परिषद अध्यक्षपद हे राखीव जागेसाठी आरक्षीत होईल, असा कायास बांधण्यात येत होता. शुक्रवारी ग्रामविकास विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आरक्षणात जिल्हा परिषद अध्यक्ष हे अनुसूचित जमाती महिलेसाठी व १३ पंचायत समित्यांचे सभापती पदाचे आरक्षण जाहीर केले आहे.
यापूर्वी जिल्हा परिषदेत १९९७ ते १९९८ या कालावधीत डॉ. विमलताई ढेरे, त्यानंतर २००७ ते २०१२ या कालावधीत शालिनीताई विखे पाटील, २०१४ ते २०१७ मंजूषाताई गुंड, २०१७ ते २०१९ पुन्हा शालिनीताई विखे पाटील आणि २०१९ ते २०२२ या कालावधीत राजश्रीताई घुले पाटील या महिलांना जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव निघाले असून त्या ठिकाणी या प्रवर्गातील महिलेला संधी मिळणार आहे. या ठिकाणी कोणाचे नशिब फळफळणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.




