धुळे dhule । प्रतिनिधी
शहरातील स्वातंत्र्य सेनानी कै.आण्णासाहेब चुडामण पाटील साहित्य नगरी हिरे भवन येथे उद्या दि.21 जानेवारीपासून सुरु होणार्या दोन दिवसीय अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनात (All India Ahirani Sahitya Sammelan) आहिराणीचा जागर (Jagar of Ahirani) होणार आहे. धुळ्याची साहित्य पंढरी खान्देशासह महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशातून येणार्या साहित्यिकांच्या मांदियाळीने (literary recession) गजबजणार आहे. नामवंत साहित्यिंकासह अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे.
यावेळी माजीमंत्री रोहिदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्याचे कला व नृत्य दिग्दर्शक संतोष संखद यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तर खान्देश साहित्य संस्कृती अभ्यासक अलीचे डेफ्लोरियान यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्या इटली या देशातील हेडलबर्ग युनिवर्सिटीच्या अभ्यासक आहेत. दरम्यान संमेलनात 250 पेक्षा अधिक आहिराणी कवींनी सहभाग नोंदविला आहे. तर कथाकथन आणि परिसंवादासह खान्देशातील नामवंत साहित्यिकही सहभागी होणार आहेत. दोन दिवस चालणार्या या साहित्य संमेलनाची सुरुवात धुळ्यातील गांधी पुतळ्यापासून ग्रंथदिंडीने होणार आहे.
खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य आयोजित सहावे अखिल भारतीय आहिराणी साहित्य संमेलनाला उद्या दि.21 जानेवारी पासून सुरुवात होत आहे. हे संमेलन दोन दिवस चालणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक रमेश बोरसे यांची निवड झाली असून स्वागताध्यक्ष म्हणून सौ.अश्विनीताई कुणाल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. आहिराणी संमेलन घेण्याचा धुळ्याला दुसर्यांदा मान मिळाला आहे. त्यामुळे खान्देशवासियांबरोबर धुळेकरांसाठी साहित्याची ही पर्वणीच ठरणार आहे. संमेलनाचे उद्घाटन सकाळी 10.30 वा. 84 वे अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते होणार असून यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील, आ.कुणाल पाटील, अलीचे डेफ्लोरियान इटली, साहित्य संस्कृती मंडळाच्या मिनाक्षी पाटील, यांच्यासह विविध लोकप्रतिनीधी उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथ दिंडीतून खान्देश संस्कृतीचे दर्शन-
आहिराणी साहित्य संमेलनाची सुरुवात सकाळी 8 वाजता शहरातील गांधी पुतळ्यापासून ग्रंथदिंडीने होणार आहे. ग्रंथदिंडीत खान्देशातील विविध परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. त्यात यात्रेतील तगतराव, लग्न सोहळा, कानबाई, भुलाबाई, पालखी असे विविध प्रकारचे खान्देशातील सण उत्सवांचे देखावे सादर होणार आहे. ग्रंथदिंडीचे उद्घाटन माजी मंत्री रोहिदास पाटील आणि सौ.लताताई रोहिदास पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
अडीचशेपेक्षा जास्त कवींचा सहभाग
अहिराणी साहित्य संमेलनात कवी संमेलन आणि कवितांना वट्टा या कार्यक्रमात खान्देशासह विविध ठिकाणीहून येणारे अडीचशे कवी सहभागी होणार आहेत. यावेळी आहिराणीसह खान्देशातील विविध बोलीभाषांवर कविता सादर केल्या जाणार आहेत. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी जगदिश देवपूरकर, डॉ.एस.के.पाटील हे राहणार आहेत. खान्देशातील विविध बोली भाषांवरील होणार्या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत मोरे हे राहणार असून कवी वाहरु सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभणार आहे
परिसंवाद, कथाकथन-
या साहित्य संमेलनात आहिराणी भाषेवरील विविध विषयांवर मान्यवर साहित्यिकांचे परिसंवाद होणार आहेत.या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ.जी.बी.शहा, डॉ.रमेश सुर्यवंशी हे राहणार आहेत. तसेच गझल मुशायराच्या अध्यक्षस्थानी सुदाम महाजन हे राहणार आहेत.
खान्देशी लोकधारा
आहिराणी संमेलनाचे औचित्यसाधुन खान्देशी लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आहिराणी, आदिवासी गाण्याचे प्रसिध्द कलाकार विनोद कुमावत, जगदिश संदानशिव, भैय्या मोरे, विश्राम बिरारी, पारिजात चव्हाण, विद्या भाटीया, आप्पा खताळ यांच्यासह नामवंत कलाकार, शाहिर आपली कला सादर करणार आहेत. आहिराणी लोकधारा कार्यक्रम दि.21 जानेवारी रोजी सायंकाळी 6 ते 9 वाजेदरम्यान होणार आहे.
सैराट,फँड्रीफेमची उपस्थिती
महाराष्ट्र गाजलेले मराठी चित्रपट सैराट, फँड्री, निळकंठ मास्तर, ट्रीपल सिट चित्रपटातील गाण्याचे नृत्य व कला दिग्दर्शक संतोष संखद यांच्या आहिराणी संमेलनाला विशेष उपस्थिती लाभणार आहे. सैराट चित्रपटातील गाजलेले झिंगाट गाण्याचे नृत्य दिग्दर्शन संतोष संखद यांनी केले आहे.
समारोप समारंभ
दोन दिवस चालणार्या सहाव्या अखिल भारतीय आहिराणी संमेलनाचा समारोप समारंभ दि.22 जानेवारी रोजी होणार आहे. समारोप संमारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आहिराणी साहित्यिक डॉ.उषा सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आ.कुणाल पाटील, साहित्यिक रामदास वाघ, अॅड.शामकांत देवरे यांची उपस्थिती लाभणार आहे.
धुळ्याला दुसर्यांदा मान
खान्देशाची अस्मिता जपली गेली पाहिजे आणि खान्देशाच्या विकासाबरोबरच साहित्य संस्कृती वाढीस लागली पाहिजे. यासाठी माजीमंत्री रोहिदास पाटील आणि आ.कुणाल पाटील यांचे नेहमीच प्रयत्न सुरु असतात. आहिराणी संमेलन घेण्याचा धुळे शहराला दुसर्यांदा मान मिळाला आहे. पाचवे आहिराणी संमेलनाच आ.कुणाल पाटील स्वागताध्यक्ष होते. त्यांच्या खान्देश विकास प्रतिष्ठाणने या संमेलनाचे आयोजन केले होते. तर यंदाचे सहावे आहिराणी संमेलन आ.कुणाल पाटील यांच्या विशेष सहाकार्यातून होत आहे.
दरम्यान आहिराणी आणि खान्देशाच्या या जागर उत्सवात साहित्यिकांसह खान्देशातील जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक खान्देश साहित्य संघाच्यावतीने करण्यात आले आहे.