पिंपळगांव बसवंत | वार्ताहर | Pimpalgaon Baswant
दम्याच्या आजारावर (Asthma Disease) उपचारासाठी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांव बसंवत (Pimpalgaon Baswant) येथील राकेश नाना आहिरे हे दोन दिवसांपूर्वी पत्नी व मुलासह मुंबई (Mumbai) येथे गेले होते. मात्र, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्र परिसरात काल बुधवार (दि.१८) रोजी झालेल्या बोट दुर्घटनेत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांवच्या आहिरे कुटुंबातील तिघांचा मृत्यू (Death) झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह पिंपळगांव बसवंतवर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रूग्णालयात (Hospital) वैद्यकीय उपचार घेऊन आहिरे हे काल (दि.१८) रोजी सायंकाळी मुबंईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. पण नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटला दिलेल्या दुर्देवी अपघातात आहिरे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. वडील नाना आहिरे यांच्या बांधकाम व्यवसायात दम्याच्या आजारपणामुळे शक्य तेवढी मदत करणारे राकेश आहिरे (वय ३२ वर्षे,रा.पवन नगर,चिंचखेड रोड,पिंपळगांव बसवंत) हे सात वर्षांपूर्वी कल्याण येथील हर्षदा यांच्याशी विवाहबध्द झाले. पाच वर्षापुर्वी त्यांच्या वैवाहिक जीवनात निधेशचा जन्म झाला. आजारपण असले तरी राकेश हे पत्नी,मुलासह वडिलांसमवेत एकत्रित कुटुंबात गुण्या गोविंदाने संसार करत होते. मात्र, दम्याच्या आजारावर उपचारासाठी ते मुंबई जात असत.
यावेळी ते पत्नी हर्षदा आहिरे (वय २८ वर्षे) व मुलगा निधेश(वय ५ वर्षे) यांच्यासह तीन दिवसांपूर्वी उपचारासाठी खाजगी रूग्णालयात गेले होते. रूग्णालयातील काम आटोपून ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या ठिकाणी आनंद घेण्यासाठी गेले. यावेळी समुद्रात सैरसपाटा करावा या हेतुने ते कुटुंबासह प्रवासी बोटीत बसले. मात्र, नौदलाच्या बोटने प्रवाशी बोटेला दिलेल्या धडकेत आहिरे कुटुंबियांचा (Families) श्वास थांबला. राकेश आहिरे यांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला. तर हर्षदा आहिरे व निधेश आहिरे यांची उपचार दरम्यान प्राणज्योत मावळली.
दरम्यान, मुलगा आणि सुनेसह नातू निधेशच्या निधनाची बातमी कळताच वडील नाना आहिरे व त्यांचे कुटुंब शोकसागरात बुडाले होते. तीन दिवसांपूर्वी मुलगा, सुन व नातवाची भेट अखेरची ठरल्याने आहिरे कुटुंबियांच्या शोकभावना अनवार झाल्या. यावेळी आहिरे यांच्या कुटुंबियांच्या आक्रोश हृद्य पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे पिंपळगांव बसवंतच्या आहिरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.