Saturday, May 4, 2024
Homeनगर'फेज टू'बाबत वेड्यात काढले

‘फेज टू’बाबत वेड्यात काढले

अहमदनगर (प्रतिनिधी)

फेज टूच्या पाणी योजनेसाठी बारा वर्षाचा लागलेला काळावधी व २४० कोटी रुपये खर्च होऊनही नगरकरांचा पाण्याचा वनवास संपलेला नाही. शहर व उपनगरातील पाण्याचा प्रश्न गंभीर असताना लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासन फेज टूचे पाणी देत असल्याचे सांगून नगरकरांना वेड्यात काढत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी केला आहे.

- Advertisement -

महापालिकेत ७ महापौर व सन २०१० पासून सात ते आठ आयुक्तांच्या कारकिर्दीनंतरही ही योजना अपूर्ण राहिलेली आहे. योजनाच पूर्ण नसल्याने नगरकरांना फेज टूचे पाणी नसून, जुन्या लाईनचे कनेक्शन फेज टू च्या पाईपलाईनला जोडण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

फेज टू पाणी योजनेचे कार्यारंभाचे आदेश २१ जून २०१० मिळाले. या योजनेतंर्गत वसंत टेकडीपूर्ण शहरात ५५० किमी लांबीची पाईपलाईन ११६ कोटी रुपये खर्चून टाकण्यात आली. त्याला जोडून नागरिकांना पाणी केनेक्शन देण्यासाठी ४ इंची एचडीपी सबलाईनसाठी वीस कोटी रुपये खर्च करण्यात आला. शहरातील अनेक भागात ही एचडीपीची पाईपलाइन टाकण्याचे काम शिल्लक आहे. फेज टू चे काम कार्यारंभाच्या आदेशानंतर २ वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र एक तपाकडे वाटचाल सुरु असताना हे काम अपूर्ण आहे.

या योजनेतून नगरकरांना पाणी देण्यात आलेले नाही. मुळाडॅम ते वसंत टेकडीपर्यंत पाणी आणण्यासाठी अमृत पाणी योजनेसाठी १ नोव्हेंबर २०१७ कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. १०७ कोटी रुपयाच्या या योजनेचे कामही दोन वर्षात होणे अपेक्षित होते. यालाही पाच वर्षे लोटली असून, वसंत टेकडीपर्यंत या योजनेद्वारे पाणी आलेले नाही. मुळाडॅम ते वसंत टेकडी या मुख्य जलवाहिनीचे ६०० ते ८०० मीटर जोडण्याचे काम अपूर्ण आहे. पाणी साठवणसाठी एक मोठी टाकी बांधलेली आहे. ६४ लाख लिटरची दुसरी टाकी दुरुस्तीचे काम थांबलेले आहे. या योजनेसाठी पंम्पिंग स्टेशनची गरज होती ते बारा वर्षानंतर लक्षात आले. ही गरज ओळखून नागपूर येथे पंम्पिंग स्टेशनचे काम सुरु करण्यात येणार आहे. या दोन्ही योजना कार्यान्वीत होऊन शहराला कधी पाणी मिळेल याची शाश्वती राहिलेली नसल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

मनपा प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ही योजना बारगळली आहे. यामध्ये अधिकारी व पदाधिकारी यांचे अपयश असून, सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. नियोजित आराखड्यानूसार बरेच काम अपूर्ण असून, योजना पुर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी आराखड्यात नसलेले काम करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवलेली आहे. तसेच या योजनेचे अनेक भागात टेस्टिंग सुद्धा झालेली नाही. याचे फेज टू चे १३० कोटी रुपये, एचडीपी सबलाईनसाठी २० कोटी रुपये व अमृतसाठी १०७ कोटी रुपये पर्यंतचे अंदाजे बीलही ठेकेदाराला अदा करण्यात आलेले आहे. या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाला, चौपट कालावधी जाऊनही नळाला या योजनेचे पाणी आलेले नाही.

पालथ्या घड्यावर पाणी असा प्रकार सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुळाडॅम पासून ते वसंत टेकडी व वसंत टेकडी पासून शहरातील पाण्याच्या टाकीत पडणारे पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास पाणी प्रश्नाची गंभीरता कमी होऊ शकणार आहे. नांदगाव शिंगवे, देहरे, विळद, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज अशा प्रकारे अनेक ठिकाणी मुख्य लाईनला जोडून पाणी कनेक्शन देण्यात आल्याने त्याभागात २४ तास पाणी असल्याचे समजते. असाच प्रकार केडगाव पाणी योजनेत घडला असून, केडगावच्या मुख्य लाईनमधून ड्रिमसिटीला पाणी कनेक्शन देण्यात आले. पूर्वी नांदगाव शिंगवे ते विळदपर्यंत महापालिकेचे कर्मचारी दररोज भेट देऊन मुख्य लाईनची पहाणी करायचे व पाणीवर नियंत्रण ठेवायचे. मात्र सध्या सदर भागात वारेमाप पाणी उपसा सुरु असून, काही भागात मेन लाईनवरून टाक्या भरले जात आहे. त्यामुळे ठराविक भागात मोठ्या प्रमाणात पाणी असून, शहरात पाणी टंचाई गंभीर झाली आहे.

कुठे पाणी मुरले…

फेज टू च्या योजनेसाठी वेळोवेळी नेमलेले ठेकेदार आणि प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने बोजवारा उडाला आहे. शहरात फेज टू साठी अनेक पाण्याच्या टाक्या बांधून दहा ते बारा वर्ष उलटूनही त्यामध्ये या योजनेचे थेंबभर पाणी पडलेले नाही. याची सखोल चौकशी करून एवढ्या वर्षात कुठे पाणी मुरले? याचा शोध घेण्याचा व लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची वेळ नगरकरांवर आली आहे. नगरकरांना अमृतचे नव्हे तर नियमीत पाणी मिळत आहे. योजना पूर्णत्वास गेली नाही, तर नगरकरांना पाणी कोठून मिळणार?

- Advertisment -

ताज्या बातम्या