अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पावसाने दडी मारल्याने आणि जोरदार वार्यांमुळे जमिनीतील ओलही सुकू लागल्याने जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सरासरीच्या 5 लाख 79 हजार 768 पैकी केवळ 1 लाख हजार 44 हेक्टर क्षेत्रावर (36 टक्के) पेरण्या झाल्या आहेत. पावसाअभावी जिल्ह्याच्या कपाशीच्या क्षेत्रात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. 30 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस झाला तरच तूर, मका, बाजरी, कपाशी आदी पिके घेता येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. तसेच लेट सोयाबिन पिकाची पेरणी केली तरी हकरत नाही, मात्र, त्याचा रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीवर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, विद्यमान परिस्थितीत जिल्ह्यात खरीप हंगामाची स्थिती बिकट आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत कपाशीच्या 1 लाख 14 हजार 342 पैकी 17 हजार 936 हेक्टरवर (16 टक्के) क्षेत्रात लागवड झालेली आहे तर सोयाबीनची 54 हजार 294 पैकी 26 हजार हेक्टर (47.80 टक्के), सूर्यफुलाच्या 534 पैकी 12 हेक्टर (2.25 टक्के), बाजरीच्या 1 लाख 40 हजार 812 पैकी 20 हजार 176 हेक्टर (14.33 टक्के, कडधान्यांच्या 78 हजार 256 पैकी 42 हजार 268 हेक्टर (54 टक्के), उडीद 17 हजार 596 पैकी 6 हजार 842 हेक्टर (38.88), मूग 40 हजार 378 पैकी 13 हजार 657 हेक्टरवर (33.82), तूरी 15 हजार 121 पैकी 21 हजार 769 हेक्टर (143.97 टक्के) आणि मका 32 हजार 570 पैकी 13 हजार 976 (32.91 टक्के) हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत 43.4 मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. जून महिन्यांत सरासरी 108 मिमी पावसाची नोंद होते, मात्र यंदा 55.6 मिमी म्हणजे सरासरीच्या निम्म्याच पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात सरासरी 139.7 मिमी पाऊस पडतो. मात्र, अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. परिणामी शेतकर्यांची चिंता वाढलेली आहे. राज्यात यंदा मान्सूनचे उशिरा आगमन झाले. त्यामुळे सुरुवातीलाच पेरण्या रखडल्या असताना त्यात पुन्हा सध्याही पावसाने ओढ दिली आहे. परिणामी आता खरिपाच्या पेरण्या करता येणार की नाही असा प्रश्न पडला आहे. समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय शेतकर्यांनी पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पाऊस लांबल्याने आता खरिपात कोणते पीक घेणे योग्य राहील याबद्दल कृषी विभागाकडून माहिती दिली जात आहे. मूग व उडदाची पेरणी आता अशक्य आहे. कपाशीचे क्षेत्रही घटन्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त केली जाते.
जिल्ह्यात जुलै महिन्यात मध्यापर्यंत सरासरीच्या 80 ते 85 टक्के पेरण्या होत असतात. मात्र यंदा केवळ 36 टक्के पेरण्या झाल्या आहेत. ज्या ठिकाणी थोडाफार पाऊस झाला तेथेच पेरण्या झाल्या आहेत. आता पाऊस लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या असल्या तरी शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 30 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस झाला तरच शेतकर्यांनी बाजरी, तूर, मका ही पिके घ्यावीत असेही आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
जुलै महिन्यांत आतापर्यंत झालेला पाऊस
जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी 108 मिलिमीटर पाऊस होतो. यावर्षी रोहिणी आणि मृग नक्षत्रात पाऊस झाला नाही. गेल्यावर्षी याच कालावधीत 111.7 मिलिमीटर पाऊस झाला होता. यावर्षी फक्त 56.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कर्जत, राहुरी आणि संगमनेर तालुक्यांत कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात अकोले तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगल्या पावसाला सुरुवात झाली असून दक्षिण भागातील काही तालुक्यांमध्येही चांगला पाऊस झालेला आहे. जुलै महिन्यात आतापर्यंतचा पाऊस (मिलिमीटरमध्ये)- नगर 40.5, पारनेर 25.8, श्रीगोंदे 37.6, कर्जत 47.7, जामखेड 64.8, शेवगाव 63.2, पाथर्डी 67.1, नेवासे 45.5, राहुरी 23.9, संगमनेर 25.6, अकोले 66, कोपरगाव 28.1, श्रीरामपूर 39.6, राहाता 47.2 मिली मीटर आहे.