अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 96 महसुली मंडळांचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या गावांना दुष्काळी परिस्थितीत देण्यात येणार्या सर्व सवलती लागू होणार असल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. दरम्यान, पालकमंत्री विखे पाटील यांनी सरकारकडे यासाठी पाठपुरावा केल्याने जिल्ह्यातील दुष्काळी महसूल मंडळांना न्याय मिळणार आहे.
मंत्रालयातील वॉर रुममध्ये गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे जिल्ह्यातील उर्वरित गावांच्या बाबतीत जिल्हाधिकार्यांकडून लवकरच अहवाल मागवून या गावांबाबतही निर्णय केला जाणार असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले. या बैठकीस मदत व पुर्नवसनमंत्री अनिल पाटील, अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री धनंजय मुडे, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, फलोत्पादन व रोजगार हमी विभागाचे मंत्री संदिपान भुमरे, मदत व पुर्नवसन विभागाचे अतिरिक्त सचिव सोनिया शेट्टी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंढे कृषी विभागाचे सचिव सुनिल चव्हाण उपस्थित होते.
नुकताच केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे 40 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र, जिल्ह्यातील तालुक्यातील पर्जन्यमानाची टक्केवारी 75 पेक्षा कमी आणि 750 मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला हा निकष लक्षात घेवून नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांतील 96 गावांचा समावेश आता दुष्काळी गावांच्या यादीत झाल्याने या गावांना जमीन महसूल घट, पिक कर्जाचे पुनर्गठण शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलाच्या वसुलीत स्थगिती शालेय व महाविद्यालयीन फी माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तिथे पाण्याचे टॅकर्स आशा सवलती तातडीने लागू करण्याता निर्णय बैठकीत घेण्यात आले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
राज्यात पशुधनाच्या चार्यासाठी 1 लाख लाभार्थी शेतकर्यांना 5 लाख टन मुरघास निर्मिती करून वितरण करण्यात येणार असून यासाठी लागणार्या 30 कोटी रुपये खर्चासाही मान्यता बैठकीत मान्याता देण्यात आली असून पशुपालकांचे नूकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. नव्याने अस्तित्वात आलेली महसूली मंडळे जिथे अद्याप पर्जन्यमापक बसवलेले नाहीत किंवा बिघडलेली आहेत, आशा महसूली मंडळांचे अहवाल जिल्हाधिकार्यांकडून मागविण्यात आले असल्याचेही विखे पाटील म्हणाले.
या महसूल मंडळांचा समावेश
नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 96 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश असून यामध्ये नालेगाव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेऊर, चिंचोडी पाटील, वाळकी, चास, रुई छत्तीशी, विरगाव, समशेरपूर, साक्रीवाडी, राजूर, शेंडी, कोतूळ, ब्राम्हणवाडा, अकोले, जामखेड, अरणगाव, खर्डा, नान्नज, नायगाव, कर्जत, राशीन, भांबोरा, कंबोळी, मिरजगाव, माही, कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, दहिगाव बोलका, पोहेगाव, नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, सलाबतपूर, कुकाणा,चांदा, घोडेगाव, सोनई, वडाळा बहिरोबा, पारनेर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हाण, वडझिरे, निघोज, टाकळी ढोकेश्वर, पळशी, पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळी मानूर, करंजी, मिरी, राहाता, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा, शिर्डी, राहुरी बुद्रुक, सात्रळ, ताहाराबाद, देवळाली प्रवरा, टाकळीमियाँ, ब्राम्हणी, वांबोरी, संगमनेर बुद्रुक, धांदरफळ बुद्रुक, आश्वी बुद्रुक, शिबलापूर, तळेगाव, समनापूर, घारगाव, डोळासणे, साकूर, पिंपरणे, शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, एरंडगाव, श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेनगाव, चिंबळा, देवदैठण, कोळेगाव, श्रीरामपूर, बेलापूर बुद्रुक, उंदिरगाव, टाकळीभानचा समावेश आहे.