Saturday, September 28, 2024
Homeनगरपावसाच्या खंडामुळे धाकधूक वाढली; खरीप हंगामाच्या किती हेक्टरवर पेरण्या पूर्ण?

पावसाच्या खंडामुळे धाकधूक वाढली; खरीप हंगामाच्या किती हेक्टरवर पेरण्या पूर्ण?

अहमदनगर (प्रतिनिधी)

यंदा जिल्ह्यात 21 जूनअखेर 1 लाख 78 हजार 290 हेक्टरवर सरासरी नियोजित क्षेत्राच्या 26.29 टक्के खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहे. यात दक्षिण जिल्ह्यात तूर, मूग, उडिद या कडधान्य पिकांसह उत्तर जिल्ह्यासह अन्य ठिकाणी सोयाबीन पिकाची पेरणी तर कपाशीची लागवडीचा समावेश आहे. मात्र, गेल्या सोमपासून जिल्ह्यात अपवाद वगळता अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहत असून पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. यामुळे पेरणी झालेल्या ठिकाणी शेतकर्‍यांची धाकधूक वाढली आहे.

- Advertisement -

यंदा नगर जिल्ह्यात जून महिन्यांच्या पहिल्या दिवसापासून पावसाने दमदार सुरूवात केली. या पावसाचे प्रमाण नगर जिल्ह्याच्या उत्तर भागापेक्षा दक्षिण भागात अधिक आहे. दमदार पावसामुळे दक्षिणेतील जवळपास सर्व तालुक्यात कडधान्यांसह अन्य खरीप हंगामातील पिकाच्या पेरण्यापूर्ण झाल्या आहेत, अथवा सुरू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिल्या सारखे चित्र दिसत आहे. यामुळे पेरणी झालेल्या भागात पाऊस लांबल्यास त्याचा उगवलेल्या पिकांवर परिणाम होतो की अशी धाकधूक शेतकर्‍यांमध्ये दिसत आहे.

हे देखील वाचा : पोहण्याचा मोह जिवावर बेतला! भंडारदरा धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

यंदा नगर जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीचा वेग सुसाट आहे. जिल्ह्यात 21 हजार हेक्टरवर 14 टक्के बाजरी पिकाची, 9 हजार हेक्टरवर 15 टक्के मका पिकाची, 20 हजार 434 हेक्टरवर 56.6 टक्के तूर पिकाची, 15 हजार 696 हेक्टरवर 33.37 टक्के मूग पिकाची, 17 हजार 134 हेक्टरवर उडिद पिकाची 42.41 टक्के, 31 हजार 849 हेक्टरवर 33.68 टक्के सोयाबीन पिकाची पेरणी पूर्ण झालेली आहे. यासह 32 हजार 345 हेक्टरवर 33.68 टक्के कपाशी पिकाची लागवड झालेली आहे. कृषी विभागाच्या नियोजना नसार 15 जून ते 15 जुलै खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीचा कालावधी आहे. साधारणपणे जून महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात सोयाबीन पिकाची पेरणी करावी, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. मात्र, यंदा पावसाने लवकर सुरूवात केल्याने खरीप हंगामातील पेरण्या सुसाट आहेत.

मात्र, जिल्ह्याच्या अनेक भागात सोमवार (दि. 17) पासून पावसाचा खंड दिसत आहे. अपवाद वगळता एखाद्या दुसर्‍या तालुक्यात काही मिली मीटर पावसाची नोंद होत असल्याने जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा खंड नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, सध्या सोसाट्याचा वारा आणि उन्ह सावलीचा खेळ यामुळे पेरणी झालेल्या भागात पिकांना तहान लागल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी दमदार पाऊस झालेला असला तरी विहीरी, बोअरवेलच्या पाणी पातळीत फारशी वाढ झालेली नाही. यामुळे पेरणी झालेली पिके सध्या तरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा पुन्हा आकाशाकडे असल्याचे दिसत आहे.

हे देखील वाचा : धक्कादायक! कृषी विभागाचे बियाणे उगवलंच नाही; शेतकऱ्यांवर कोसळले संकट

जिल्ह्यात जून महिन्यांतील गेल्या 20 दिवसात 194.8 मिली मीटर पावसाची नोंद झालेली आहे. गुरूवारी जिल्ह्यात जामखेड, कर्जत आणि श्रीगोंदा तालुका मिळून सरासरी दीड मिली मीटर पावसाची नोंद झालेली आहे. उत्तर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून मोठ्या पावसाची नोंद नाही. बागायत भागात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाची लागवड केलेली असून या कपाशीला पाण्याची गरज आहे.

तालुका आणि पिकनिहाय पेरण्या

कोपरगाव, श्रीगोंदा आणि राहाता तालुक्यात सर्वाधिक मका पिकांची पेरणी झालेली असून अकोले तालुक्यात मका पिकाची पेरणीच झालेली नाही, शेवगाव तालुक्यात अवघी 23 हेक्टर आहे. बाजरीच्या पेरणीत नेवासा, पारनेर तालुका आघाडीवर असून राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, कर्जत आणि जामखेड तालुक्यात हे प्रमाण अत्यल्प आहे. पाथर्डी, नेवासा, नगर, श्रीगोंदा, शेवगाव हे तालुके तूर पिकांच्या पेरणीत आघाडीवर आहेत. मूगाच्या पेरणीत नगर, पारनेर, पाथर्डी अग्रेसर असून जिल्ह्यातील एकूण पेरणीत या तील पेरणीचे क्षेत्र आहे. पांढरे सोने लागवडीत शेवगाव तालुका नंबर वन आहे. तालुक्यात त्यानंतर नेवासा आणि पाथर्डी तालुक्यात प्रत्येकी 14 हजार हेक्टरवर कपाशी लागवड असून राहुरी, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर तालुक्यात कपाशी लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.

हे देखील वाचा : “महायुतीत अजितदादांचं खच्चीकरण, त्यांनी आंबेडकरांसोबत…”; NCP नेत्याचं खळबळजनक विधान

- Advertisment -

ताज्या बातम्या