अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पाण्यावरून नगर-नाशिक जिल्ह्याविरोधात मराठवाडा असा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण नगर, नाशिक जिल्हयात अत्यल्प पाऊस झालेला आहे. त्यामुळे पाणी सोडण्याच्या आदेशाचा फेरविचार व्हावा अशी मागणी नगर जिल्ह्यातून होत असतानाच, आता या वादात शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी उडी घेतली असून रस्त्यावर उतरण्याचा तसेच न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
धरणांत पाणी असलेतरी अनेक तालुक्यांत 50 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी मराठवाड्याला पाणी सोडण्याबाबतचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी नगर, नाशिक जिल्हयातील आजी माजी लोकप्रतिनिधींसह शेतकर्यांकडून होत आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर लक्ष केंद्रीत करताना शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, मराठवाड्याला पाणी मिळाले पाहिजे ही आमची मागणी आहे. न्यायालयाने देखील आदेश दिला आहे, पण काही लोकांचा याला विरोध आहे. या लोकांना संजय शिरसाट यांनी इशारा दिला आहे. तर आमच्या हक्काचं आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाणी द्यावे, अशी विनंती करत यासाठी आम्ही देखील न्यायालयात जाणार असून, वकिलांची फौजी उभी करणार आहोत.
आम्हाला आता लढा उभा करावा लागणार आहे, पाण्यासाठी आडवे येत असलेल्यांना हा इशारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर नवीन धरण बनवू नयेत अशी आमची मागणी सांगत आता आम्ही रस्त्यावर उतरणार आहे. आम्हाला रस्त्यावर उतरवावे लागले तरीही मागे पुढं पाहणार नाही, असा इशारा सरकारला दिला आहे.