नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
एअर इंडियाच्या विमानाचा (AI171) अहमादबादमध्ये अपघात झाला होता, त्याचा पहिला चौकशी अहवाल समोर आला आहे. भारतीय विमान अपघात तपास संस्थेने (AAIB) सादर केलेल्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. एअर इंडिया कंपनीचे एआय१७१ हे ड्रीमलायनर विमानाने लंडनसाठी उड्डाण घेतले होते. विमानाने सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले आणि अवघ्या काही सेंकदात ते कोसळले. पहिल्यांदाच ड्रीमलायनर विमानाचा इतका भीषण अपघात झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले. आता या अपघाताची चौकशी करत असलेल्या भारतीय विमान अपघात चौकशी विभागाने प्राथमिक अहवाल दिला आहे. त्यातून खळबळजनक माहिती नोंदवण्यात आली आहे.
एअर इंडियाच्या विमानाचे टेकऑफच्या काही सेकंदातच दोन्ही इंजिन अचानक बंद पडले होते. त्यामुळे विमानाची गती मंदावली आणि काही क्षणात विमान कोसळले होते. या दरम्यान दोन्ही पायलट्समध्ये बातचीत झाली होती. एका पायलटने विचारले होते की, फ्यूल का बंद केले आहे? यावर दुसऱ्या पायलटने उत्तर दिले होते, मी असे काहीही केले नाही. या बातचितनंतर काही सेकंदातच विमानाची स्पीड कमी होत गेला आणि पुढच्या काही क्षणात विमान कोसळले. दरम्यान, एएआयबीच्या प्राथमिक अहवालानुसार विमान उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच कोसळले. विमान कोसळण्यापूर्वी कॉकपीटमधील वैमानिकांचा जो संवाद झाला तो ब्लॅकबॉक्समध्ये रेकॉर्ड झाला आहे.
दोन्ही पायलटमधील संवाद रेकॉर्ड झाला
कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये अपघाताच्या काही क्षणांपूर्वी एक पायलट दुसऱ्याला विचारतो, तु इंजिन कटऑफ का केलंस?, त्यावर मी काहीही केलं नाहीय, असे दुसरा पायलट उत्तर देतो. दोन्ही पायलट्समधील हे संभाषणाचा उल्लेख प्राथमिक चौकशीच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे.
दोघांमधील संवाद संपत नाही, तोच विमानाची गती कमी व्हायला लागते. विमानाचे दोन्ही इंजिन बंद पडतात आणि एअर इंडियाचे एआय१७१ विमान अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहाला जाऊन धडकते.
पायलटच्या बातचीतनंतर एक इंजिनने (इंजिन -२) थोड्यावेळासाठी काम केले. मात्र दुसरे इंजिन (इंजिन-1) व्यवस्थित सुरु होऊ शकले नाही. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, विमानाला बाहेरून पक्षी धडकला याचे कोणतेही पुरावे नाहीत.
१५ पानांचा अहवाल तयार
अहमदाबाद विमान अपघाताची विमान अपघात तपास संस्थेकडून (AAIB) चौकशी सुरु आहे. त्यांनी केलेल्या तपासानंतर १५ पानांचा अहवाल तयार केला आहे. या सुरुवातीच्या अहवालात अपघाताच्या तांत्रिक कारणांचा खुलासा झाला आहे. तसेच कॉकपिटमध्ये वैमानिकांच्या झालेल्या शेवटच्या संवादाने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
इंजिनमधील थ्रस्ट संपुष्टात आले
एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहमदाबाद येथील विमानतळावरून उड्डाण केल्यावर विमानाच्या इंजिनांना होणाऱ्या इंधनाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारे स्विच बंद केले गेले होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच इंजिनामधील थ्रस्ट संपुष्टात आले आणि विमान खाली कोसळल्याचे समोर आले आहे.
अपघातात २७१ जणांचा मृत्यू
दरम्यान, अहमदाबाद विमान अपघातात २७१ जणांचा मृत्यू झाला होता. यात विमानातील २४१ प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळले तेथील अनेकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये महाराष्ट्रातील ९ जणांचा समावेश आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या काही सेकंदात हा भीषण अपघात झाला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




