अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून ही सेवा लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहती, शिक्षण संस्था, आरोग्य सेवा तसेच धार्मिक पर्यटनास चालना मिळेल. नगर-मुंबई हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असून जिल्ह्यासाठी विमानतळाची गरज असल्याने त्यासाठी लढा दिला जाईल, असा निर्धार खा. नीलेश लंके यांनी केला.
नगरला आर्किटेक्टस, इंजिनिअर्स अॅण्ड सर्वेअर्स असोसिएशन, द इन्स्टिटयूशन ऑफ इंजिनिअर्स आणि बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्यांसमवेत खा. लंके यांची बैठक पार पडली. या बैठकीत खा.लंके यांनी शहर तसेच जिल्ह्याच्या विकासातील अडचणी जाणून घेतल्या व उपाययोजना कशा करता येईल यासंदर्भात चर्चा केली. या बैठकीत विविध संस्थांनी शहराच्या विकासासमोरील अडथळयांबाबत माहिती दिली. रक्षा मंत्रालयाच्या अटी, पुरातत्व विभागाचे निर्बंध, टाऊन प्लॅनिंगमधील भ्रष्टाचार तसेच रेड आणि ब्लू लाईनसंबंधीच्या नियमांमुळे शहराचा विकास ठप्प होत असल्याचे मुद्दे यावेळी मांडण्यात आले. सिना नदीच्या रेड आणि ब्लू लाईनच्या अटींमुळे बांधकाम आणि शहराचा विस्तार अडखळल्याची तक्रार केली.
नगर शहरास पुराचा फारसा धोका नसतानाही हे नियम लागू केल्याने विकास प्रक्रियेत अडथळे येत आहेत.जलसंपदा विभागाकडे हा विषय उपस्थित करून आवश्यक त्या सुधारणा करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. बैठकीला अतुल आत्रे, रामनाथ वैराहर, हरीश इंगळे, अमित मुथा, विनोद काकडे, गिरीश अग्रवाल, आदिनाथ दहीफळे, संजय गुंदेचा, यश शाह, विजयकुमार पाडीर, दीपक दारे, अभय राजे, बबन खैरे, दीपक विधाते, प्रकाश गांधी, विक्रम राठोड, नगरसेवक योगीराज गाडे यांचा समावेश होता.