नाशिक | Nashik
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा मार्ग आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. समृध्दी महामार्गाचा चौथा आणि शेवटचा टप्पा आज पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर आज अडीच वर्षांनी या महामार्गातील शेवटच्या टप्प्यात ७६ किमी इगतपुरी ते आमणे या रस्त्याचे लोकार्पण झाले. तब्बल 61 हजार कोटी रुपयांचा खर्च करुन 701 किमीचा समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत सुरू झाला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याच्या म्हणजेच इगतपुरी ते आमणे (76 किमी) दरम्यानच्या लोकार्पणाचा सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला. दरम्यान, या महामार्गासाठी लागलेल्या सिमेंट, स्टिलची आकडेवारीच आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. उद्घाटनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्यातील रस्त्याचे लोकार्पण झाल्याने प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ वाचेल, इंधन बचत होईल, प्रवास वेगवान होईल. त्याचप्रमाणे औद्योगिकीकरणास चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, हा प्रकल्प सुरू होत असताना अनेकांनी विरोध केला होता. छत्रपती संभाजीनगरला हॉलमध्ये मीटिंगमध्ये आम्हाला विरोध करायला सांगितला होता. पण, नंतर ज्यावेळी भूसंपादनाचा दर जाहीर केला तेव्हा ज्यांनी विरोध करायला लावला त्यांनीच जाऊन पैसे घेतले, असे अजित पवारांनी सांगितले.
७०१ किमी लांबीचा सर्वाधिक रुंदीचा मार्ग
पुढे अजित पवार म्हणाले, “आज ८ हजार ८०० हेक्टर जमीन एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी घेतलेली आहे. यामध्ये ५४६ एकर वनविभागाची जमीन आहे. जवळपास १९०३ लहान मोठे ब्रिज केले आहेत. डिसेंबर २२ मध्ये या प्रकल्पाला सुरुवात केली तेव्हा २ लाख वाहने येथून जात होती, आता मे २५ मध्ये १० लाख वाहने जायला लागली. ही संख्या अशीच वाढत जाणार आहे. आता थोड्याश्या गोष्टी करायच्या आहेत. स्वच्छतागृह, हॉटेल्ससाठी टेंडर काढले गेले आहेत. लोकांच्या मनातील समस्या दूर करण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले आहे. ७०१ किमी लांबीचा देशातील सर्वाधिक रुंदीचा हा मार्ग आहे.”
१२ कोटी सिमेंट बॅग, ७ लाख मेट्रीक टन स्टीलचा वापर
समृद्धी महामार्गासाठी ५५ हजार ५०० कोटींचा खर्च अपेक्षित होता. पण, हा खर्च ६१ हजारांवर पोहोचला आहे. या महामार्गासाठी तब्बल १२ कोटी सिमेंट बॅग वापरण्यात आल्या असून स्टीलही मोठ्या प्रमाणात वापरले आहे. ७ लाख मेट्रिक टन स्टीलचा उपयोग रस्ता उभारण्यासाठी करण्यात आला आहे. हा महामार्ग म्हणजे फार मोठे काम राज्यासाठी झाले आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली आणि आता ते मुख्यमंत्री असताना उद्घाटन होते असे क्वचित होते. एकनाथ शिंदे यांचे योगदान लाभले हे विसरून चालणार नाही.
आमच्या ऑडीचे सारथ्य एकनाथ शिंदेंनी केले
आमच्या ऑडी गाडीचे सारथ्य एकनाथ शिंदे यांनी केले, मी बघत होतो व्यवस्थित आहे की नाही, असा मिश्कील संवाद अजित पवारांनी यावेळी केला. आधी मुख्यमंत्री असणारे आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री हे बाबा गाडीवर बसल्यावर चालेल का नाही. मी म्हटले मला LC द्या निरंजन डावखरेची होती तो आधीचा राष्ट्रवादीचा असल्याने त्याला म्हटले दे गाडी, असा आजच्या कार्यक्रमातील मजेशीर किस्सा अजित पवारांनी सांगितला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा