मुंबई | Mumbai
काल मुंबईत मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात पालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली. त्यासोबतच राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरेंनी सरकारवर टोलेबाजी केली. एक खोक्याभाई काय घेऊन बसलात अख्खी विधानसभा भरलेली आहे, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल केल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर आत सगळे खोक्याभाईच भरलेत असंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंनाच खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेत सगळेच खोक्याभाई आहेत, असं राज ठाकरे म्हणाले, असा प्रश्न अजित पवार यांना पत्रकारांनी केला असता, ‘ते कधी निवडून आले?’, असा खोचक सवाल अजित पवार यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. दरम्यान, अजित पवार यांनी राजकीय अपयशाचा मुद्दा उपस्थित करत डिवचल्यानंतर आता राज ठाकरेंकडून कसा पलटवार केला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
“मला हे कळलं नाही, एक खोक्याभाई काय घेऊन बसलात? अख्खी विधानसभा खोक्यांनी भरलीय. विधानसभेत सगळे खोकेभाईच भरलेत. त्यांच्यामुळे मुख्य विषय बाजूला राहतात आणि आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीत तुम्हाला भरकटवून टाकलं जात आहे”.
राज ठाकरेंच्या टीकेवर संजय राऊत काय म्हणाले ?
अख्खं सभागृह खोक्याने भरलं आहे की नाही, त्यांच्या मताशी मी असहमत आहे. पण राज ठाकरे जे बोलत आहेत हे विधान गांभीर्याने घेतले पाहिजे. त्यांनी सध्याच्या राजकारणावरती बोट ठेवले आहे. असे खोके भाई असल्यामुळे ते निवडणुकीत सहज जिंकून येतात. सगळे खोके भाई एकत्र झाले आणि राज्यात सरकार बनवलं आहे, असे संजय राऊत म्हणाले.