Sunday, October 6, 2024
Homeब्रेकिंग न्यूजशरद पवारांचे 'ते' वक्तव्य धादांत खोटं; अजित पवारांचा काकांवर पलटवार

शरद पवारांचे ‘ते’ वक्तव्य धादांत खोटं; अजित पवारांचा काकांवर पलटवार

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका मुलाखतीत बोलतांना “२००४ च्या निवडणुकीनंतर आमच्या पक्षाने मुख्यमंत्रीपद घेतले असते आणि छगन भुजबळ किंवा इतर कुठल्या नेत्याला आम्ही मुख्यमंत्री (CM) बनवले असते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला असता,” असे म्हटले होते. त्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत उपस्थितांना संबोधित करतांना प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता तर आमचा पक्ष फुटला असता हे केलेले वक्तव्य धादांत खोटं आहे. त्यावेळच्या शरद पवारांसोबतच्या चर्चेत मी देखील होतो. आमच्याबरोबर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे ही सगळी वरिष्ठ मंडळी होती. आम्हा सर्वांना वाटत होतं की मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच असायला हवं. त्यावेळी मी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नव्हतो. मला त्यावेळी वाटलं होतं की, भुजबळ मुख्यमंत्री होतील. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावर खऱ्या अर्थाने कोणी जर आमचा पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम केले असेल तर ते काम छगन भुजबळांनी केले आहे. ही गोष्ट आमच्यापैकी कोणीही नाकारू शकत नाही”, असे अजित पवारांनी म्हटले.

पुढे बोलतांना अजित पवारांनी म्हटले की, “आमच्यापैकी अनेकांना वाटत होतं की छगन भुजबळ हेच मुख्यमंत्री होतील. परंतु, शरद पवार यांनी भुजबळांना मुख्यमंत्री न करण्याचे मला माहीत असलेले कारण वेगळेच आहे. ११९१ साली शरद पवार यांना संरक्षण मंत्री व्हावे लागले त्यावेळी पद्मसिंह पाटील याचं मुख्यमंत्री पदासाठी नाव देण्यात आले होते. मात्र, मध्येच सुधाकरराव नाईक यांचं नाव देण्यात आले. त्यावेळी शरद पवार यांचं एक वर्ष सुधाकरराव नाईक यांनी ऐकले नाही. २००४ साली प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना वाटले असेल की आपले आधीच कोणी ऐकले नव्हते. त्यामुळे आता पुन्हा मुख्यमंत्री केलं तर आपलं कोणी ऐकणार नाही”, असंही अजित पवार म्हणाले.

साताऱ्याची राज्यसभेची जागा साताऱ्यालाच मिळणार

प्रत्येकाला मानसन्मान हवा असतो, कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. लोक देतील तो कौल मान्य करून आपण पुढे जायला हवे. अशी भूमिका सर्वांनी मान्य करायला हवी. आपण वेगळा निर्णय घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. मागच्या वेळी ४१ जागा भाजप युतीच्या होत्या तर विरोधक ७ जागांवर होते. त्यामुळे आपल्याला यंदा जागा कमी मिळाल्या. साताऱ्याची जागा जरी आपण दिली असली तरी आता त्या बदल्यात मिळणारी राज्यसभेची जागा साताऱ्यालाच देण्यात येईल, इतर कुणीही मागणी करू नये, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या