शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
संत साहित्य केवळ धर्मापुरते आणि भक्तीपुरते सिमीत नाही तर समाजाच्या उध्दाराकरिता उपयुक्त ठरले आहे. या संत साहित्याने समाजामध्ये सत्व आणि तत्व रुजवितानाच समाजाला सत्य सांगून विषमता दूर करण्याचे मोठे काम केले असल्याचे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले. वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या 13 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्याप्रसंगी राज्यातून आलेल्या संत साहित्य क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संमेलनामागील भूमिका विषद केली.
वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे, संमेलनाचे नूतन अध्यक्ष संजय महाराज देहूकर, मावळते अध्यक्ष माधव महाराज शिवडीकर यांच्यासह राज्यातून आलेले वारकरी आणि संत साहित्याचे अभ्यासक याप्रसंगी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणार्या अहिल्यानगरमध्ये संत साहित्य संमेलन व्हावे हा आमच्या दृष्टीने फार मोठा अभिमान आहे. या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात असलेले अध्यात्मिक ठिकाण हे आमच्या दृष्टीने मोठी उपलब्धी असल्याचे स्पष्ट करुन या अध्यात्म्कि दृष्टीचा प्रेरणास्त्रोत हा पंढरपूरचा पांडुरंग आहे. देहू आळंदी तिर्थस्थान संत धर्माची लोक विद्यापीठं आहेत. समाजाच्या प्रत्येक स्तरातून संतरुपे व्यक्त झाली. त्यांनी त्यांच्या जीवनातून साधूत्वाचे उद्दात आदर्श प्रगट केले. संतांच्या या कार्यातूनच भक्तीरुप अवतरले असल्याचे त्यांनी सांगितले.
हजारो वर्षांची परंपरा असलेली आषाढीची वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रवाही सजीव रुप आहे. ज्ञानोबा, तुकोबा हे या संस्कृतीचे श्वास आहेत. संत नामदेवांनी या संस्कृतीचा भारतभर प्रचार केला. संत एकनाथांनी धर्म मंदिराचे आधार बनण्याचे काम केले, असा उल्लेख करुन ना. विखे पाटील म्हणाले, संत साहित्यातून व्यक्त होणारी भावदृष्टी आणि भावसाधना यांचे आकलन होणे महत्वाचे आहे. कारण संत साहित्यानेच भक्ती आणि सामाजिक शक्तीचा संदेश आपल्याला दिला आहे. या देशाला भक्तीच्या एका सुत्रात ठेवण्याचे काम संत साहित्याने केले असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख ना. विखे पाटील यांनी आपल्या भाषणात केला.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हणाले, संताच्या विचारांचा वारसा घेवून वारकरी काम करतात. माणसांचे कल्याण व सुख-दुखासाठी जगण्याचा मंत्र वारकरीच देतात. वारकरी संप्रदायात महिलांची संख्या लक्षणीय आहे. महिलांवर होणार्या वाढत्या अत्याचाराचे प्रमाण लक्षात घेवून सामाजिक प्रबोधनासाठी वारकर्यांनी अधिक पुढाकार घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संमेलनाचे उद्घाटक सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ म्हणाले, परमेश्वर आणि सर्वसामान्य जनता यांच्यात संवाद घडवून आणण्याचे काम वारकरी करतात. ही संस्कृती टिकविण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रित राहिल्या तरच समाजाच्या उत्कर्षाचे काम होवू शकते. त्यामुळेच या संमेलनाच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. संमेलनासाठी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली असल्याचे त्यांनी जाहीर केले.
याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष संजय महाराज देहूकर, माधव महाराज शिवडीकर व डॉ. सदानंद मोरे यांचीही भाषणे झाली. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी प्रास्ताविक केले. संमेलनाच्या उद्घाटनापुर्वी साईबाबा मंदिर ते संमेलन स्थळापर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली. दोन दिवस चालणार्या परिषदेला राज्यातील वारकरी आणि संत साहित्याचे अभ्यासक उपस्थित राहणार आहेत.