Saturday, July 27, 2024
Homeनगरदिर्घ प्रतिक्षेनंतर आढळा धरण भरले

दिर्घ प्रतिक्षेनंतर आढळा धरण भरले

वीरगाव | वार्ताहर

अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील 15 गावांच्या 3914 हेक्टर क्षेत्राचे सिंचन करणारे आढळा धरण दिर्घ प्रतिक्षेनंतर शनिवारी पहाटे 5 वा. पुर्ण क्षमतेने भरल्याची माहिती जलसंपदाचे सहाय्यक अभियंता रजनीकांत कवडे यांनी दिली. सांडव्यावरुन नदीपात्रात पाणी झेपावल्याची बातमी आली आणि लाभक्षेत्राला आनंदाचे उधाण आले.

- Advertisement -

आढळा पुर्ण क्षमतेने भरले असले तरी लाभक्षेत्रातील झालेल्या अत्यल्प पर्जन्यामुळे धोक्यात आलेल्या खरीप आणि उभ्या पिकांसाठी आवर्तन सोडण्याची वेळ मात्र यंदा जलसंपदा खात्यावर आली. गेल्यावर्षी 1060 दलघफू पाणीसाठा क्षमतेचा हा मध्यम प्रकल्प 22 जुलै रोजी पुर्ण क्षमतेने भरला होता.यंदा मात्र पाणलोटातील अत्यल्प पर्जन्यमानामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत दिड महिना उशीर झाला.शिवाय मागील वर्षीच्या 537 दलघफू या शिल्लक पाणीसाठ्यात 523 दलघफू इतक्याच नवीन पाण्याची आवक झाल्याने पाणलोटात कमी झालेल्या पावसाचा अंदाज येईल.

दोन दिवस बरसलेल्या कमीअधिक प्रमाणातला संततधारेचा मान्सुन आढळा धरणासाठी वरदान ठरला. पावसाने डोळे उघडल्याने चोवीस तासांत केवळ दोन-तीन दलघफू पाण्याची आवक असायची.धरण भरेल की नाही या शंकेने लाभक्षेत्राची चिंता वाढली होती.धरण भरल्यानंतर सांडव्यावरुन 70 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु झाला. सांडव्यावरुन नदीपात्रात झेपावलेल्या पाण्यात अधिकची वाढ झाल्यास नदी प्रवाही होईल आणि नदीपात्रात असणारे छोटे मोठे बंधारे भरण्यासही मदत होईल.

दोन दिवस झालेल्या पावसामुळे मरणासन्न झालेल्या खरिपाच्या बाजरी, मका,सोयाबीन या पिकांना चांगली टवटवी आली. माना टाकलेल्या खरीपासोबतच्या सा-याच उभ्या पिकांना जीवदान मिळाल्याने शेतक-यांच्या चेह-यावरील चिंता काहीशी दूर झाली. आढळा धरण भरल्याचा आनंद असला तरी सारा पावसाळा कोरडाठाक गेल्याने भविष्यात पाण्याचा तुटवडा जाणवण्याची शंका मात्र सतावते आहेच. उर्वरीत पावसाचे दिवस तरी भरभरुन पाण्याचे असावेत जेणेकरुन नदीबरोबरच शेतीशिवारातले ओढेनालेही भरुन वाहतील आणि भुजलस्तर वाढल्यास वर्षाची चिंता मिटेल ही अपेक्षा आहे.

पावसाळी दिवसांत आवर्तन

कमी पावसामुळे आढळेच्या लाभक्षेत्रातील खरीपाची आणि इतर उभी पिके जळणी पडली होती. या पिकांसाठी आवर्तनाची मागणी झाली. 330 हेक्टर क्षेत्राची पाणीमागणी झाल्याने आवर्तन सुरु झाले. या आवर्तनात साधारण 100 दलघफू पाणीवापर होईल असे जलसंपदाचे सहाय्यक अभियंता रजनीकांत कवडे यांनी सांगितले. आता दोन दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने पाणीमागणी घटण्याची शक्यता आहे.खरीपासाठी भर पावसाळ्यात पाणी सोडण्याची वेळ ही बहूदा अनेक वर्षांनंतर आली असावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या