अकोले |प्रतिनिधी| Akole
शहर आणि परिसरास शनिवारी (दि.10) सायंकाळी वादळी पावसाने (Stormy Rain) झोडपले. सुमारे अर्धा तास सुरू असणार्या पावसाने काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. तर झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब वाकले असून, पुरवठाही खंडित झाला आहे.
शहराजवळील खंडोबा माळ परिसरातील शोभा अशोक ताजणे यांचे घराचे या पावसात (Rain) मोठे नुकसान झाले आहे. अन्नधान्याचे व संसारोपयोगी साहित्याचे सुमारे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अकोलेचे तलाठी पी. डी. तोरणे व त्यांचे सहकारी विनायक वडजे यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने नुकसानीचा पंचनामा केला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असणार्या सततच्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान (Loss) झालेले आहे. त्यातच शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शहर व तालुक्यात काही भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. आजही अर्धा तास चाललेल्या पावसाने झोडपून काढले.
आढळा खोर्यातील वीरगाव येथील वीज उपकेंद्राचे नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे वीजेचे खांब वाकले आहेत. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे अकोले (Akole) शहर व परिसरासह वीरगाव येथील वीज पुरवठा खंडित झाला आहे. याचबरोबर कांदा, डाळिंब, टॉमेटो आदी पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचले होते. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकर्यांची चांगलीच धांदल उडाली. भंडारदरा (Bhandardara) पाणलोटक्षेत्रात शुक्रवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मात्र, आज पावसाचे वातावरण होते तरी तिकडे सायंकाळपर्यंत पावसाने पाठ फिरवली.
दरम्यान, वीरगावमध्ये जोरदार वादळात वीजवाहक खांब, तारांचे नुकसान झाले. जोरदार वादळामुळे अकोले वरुन येणार्या 33 केव्ही वीजवाहक तारांवर चिंचेचे झाड कोसळल्याने तत्काळ वीजप्रवाह खंडित झाला. गर्दणी फिडरला जाणार्या वीजवाहक तारांवरही झाड कोसळले. राजेंद्र घायवट यांच्या गोठ्यावरील आणि विजय घायवट यांच्या घरकुलावरील पत्रे वादळाने उडून गेल्याने सारा प्रपंच पावसात भिजला. विजेचे खांब आणि तारांचे मोठे नुकसान झाल्याने तब्बल 18 ते 20 तास वीजप्रवाह मिळणार नसल्याची माहिती मिळाल्याने वीरगावकर आणि परिसर रात्रभर अंधारातच राहिला.
कांदा उत्पादकांचे (Onion Growers) मोठे हाल या वादळामुळे झाले. कांदा काढणी आता संपत आली असून शेतात झाकून ठेवलेल्या कांद्यावरील आच्छादने वादळाने उडवून लावल्याने अनेक शेतकर्यांचा कांदा भिजल्याने मोठा आर्थिक फटका बसणार आहे. वीरगाव शिवारातही अनेक झाडे कोसळल्याने शिवार रस्ते बंद झाले होते. पाऊस मर्यादित पडला मात्र घोंघावणार्या वादळाने मोठी दहशत निर्माण करुन लोकांचे मोठे नुकसान केले.