नाशिक । प्रतिनिधी Nashik
केंद्र शासनाच्या उडान योजनेचा तीन वर्षांचा कालावधी संपुष्टात आला आहे. मात्र, व्यावसायिक तोटा आणि नाशिकमधून प्रतिसाद नसल्यामुळे अलायन्स एअरलाइन्सने त्यांच्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.परंतु, दुसरीकडे स्पाइस जेटची नाशिकमधून, हैदराबाद, दिल्ली आणि पाँडेचरी-तिरूपती (कनेक्टिव्ह) सेवा कायम आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डाॅ.भारती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. केवळ नाशिकच नव्हे तर देशभरात विविध ठिकाणी उडान योजना बंद झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले .
उडान योजनेअंतर्गत नाशिकमधून विमानसेवा बंद झाल्यामुळे सर्वच स्तरांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ना.पवार यांनी शुक्रवारी (दि. ४) आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
त्या म्हणाल्या,केंद्राने उडान योजना राबविताना तीन वर्षांचा कालावधी ठरवून दिला आहे. त्यानुसार अलायन्स एअरलाइन्सला नाशिकमधून सेवा देताना जानेवारीत त्यांची मुदत संपुष्टात आल्यानंतरही कंपनीने आतापर्यंत सेवा सुरू ठेवली.मात्र, व्यावसायिक उडानसाठी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभत असल्याने कंपनीने नाशिक-पुणे तसेच हैदराबाद-नाशिक-अहमदाबाद-दिल्ली सेवा बंद केली. स्पाइस जेटची नाशिक-दिल्ली सेवा कायम असून, त्याची मुदत पुढील वर्षापर्यंत असल्याचे त्यांनी सांगितले. अलायन्स एअरलाइन्सच्या सेवे बरोबरच स्पाइस जेट आणि इंडिगो सेवेचा आणखी विस्तार करण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचेही ना.पवार यांनी स्पष्ट केले.
नाशिकमध्ये विमानसेवेला मिळणारा प्रतिसाद बघता उड्डाणमधून त्यांना मुदतवाढ मिळावी, यासाठी केंद्रीय नागरी विमानमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पवार यांनी दिली. नाशिकमधून गोवा, कोलकाता, भोपाळच्या विमानसेवेसाठी इंडिगो कंपनीशी संपर्कात असल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान, नाफेड चाैकशीबाबत स्वतंत्र बैठक घेणार असल्याची माहिती ना. पवार यांनी दिली.
हायस्पीड प्रकल्प रद्द नाही
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड प्रकल्पात वेगमर्यादा आणि अनेक तांत्रिक अडचणी नक्कीच आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी या अडचणी दूर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच महारेल व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत तांत्रिक अडचणी दूर करत नव्याने प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. नव्याने प्रस्ताव केंद्राकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला जाईल, अशी माहिती डॉ. भारती पवार यांनी दिली.