अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक जलद व सुरळीत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी, प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार ई- गव्हर्नस सुधारणा कार्यक्रमांतर्गत महानगरपालिकेने विविध उपक्रम हाती घेतले. शासनाने कामगिरीचे मूल्यमापन करत 200 पैकी 160 गुण दिले आहेत. त्यामुळे ई-गव्हर्नस सुधारणेत अहिल्यानगर महानगरपालिकेने राज्यात पहिल्या 10 क्रमांकांमध्ये स्थान मिळवले असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
डांगे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेमधून महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय विभागांमध्ये 150 दिवसांचा ई- गव्हर्नस सुधारणा कार्यक्रम राबविण्यात आला होता. ई- गव्हर्नन्स अंतर्गत राबविण्यात येणार्या सुधारणांचा विचार करून त्यांचे मूल्यमापन करून त्यांना गुणांकन देण्यात आले. त्यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेला उत्कृष्ट संकेतस्थळाकरिता (29/35), आपले सरकार व लोकसेवा हक्काकरिता (50/55), ई- ऑफिस कार्यप्रणालीच्या वापरासाठी (28/35), विविध ऑनलाइन सेवांच्या डॅशबोर्डसाठी (11/20), नाविन्यपूर्ण वेब प्लीकेशन अंतर्गत नागरिकांना व्हॉट्सअॅपव्दारे देण्यात येणार्या सेवा व मदतीकरता (18/20), नागरिकांना देण्यात येणार्या एआय हेल्पलाईनसाठी (7/15) व कार्यालयांमध्ये विविध विकास कामांकरिता जीआयएसच्या वापरासाठी (17/20) असे एकूण 200 पैकी 160 गुण मिळाले आहेत.
विविध निकषांच्या आधारावर महाराष्ट्र शासनाने सर्व 29 महानगरपालिकेतून पहिल्या 10 उत्कृष्ट महानगरपालिकांची निवड केली आहे. त्यामध्ये विविध निकषांच्या आधारावर अहिल्यानगर महानगरपालिकेने 160 गुणांकनासह प्रथम 10 उत्कृष्ट महानगरपालिकेमध्ये स्थान मिळवले आहे. डांगे यांच्या अधिपत्याखाली व सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंडे यांच्या नियंत्रणाखाली संगणक विभाग प्रमुख, तांत्रिक सहाय्यक व कर्मचारी यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. नागरिकांना तात्काळ व सुरळीत सेवा मिळावी, आवश्यक माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.





