अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (गुरूवारी) शहरात सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होत आहे. दोन वर्षांच्या प्रशासकराजनंतर शहराच्या कारभाराचा कौल मतपेटीत बंद होणार असून, 70 शाळांमधील 345 मतदान केंद्रांवर शांततापूर्ण, पारदर्शक व निर्भय वातावरणात मतदान होत आहे. उद्या (शुक्रवारी) मतमोजणी होणार आहे. शहरात भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) युती, शिवसेना (शिंदे गट), महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होत असून इतर छोट्या-मोठ्या पक्षांसह अपक्ष नशीब अजमावत आहेत.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शहरात सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड तैनात करण्यात आले असून, सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित आहेत. संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, पोलीस पथके सातत्याने गस्त घालत आहेत. काही प्रभागात दोन गटांत वादाच्या घटना घडल्या आहेत. यातून हाणामारी होऊन खूनाचा प्रयत्न झाला आहे. यापार्श्वभूमीवर आज मतदान होत असल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मतदान केंद्रांवर आरोग्य पथके, पिण्याच्या पाण्याची व वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या शहराच्या प्रगतीसाठी मतदान हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आज मतदानानंतर ईव्हीएम मशीन शीलबंद करून स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात येणार असून, उद्या (शुक्रवारी) एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार आहे. शहराच्या विकासाची दिशा ठरविणार्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





