अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नव्याने निवडून आलेल्या महापौर ज्योतीताई गाडे आणि उपमहापौर अॅड.धनंजय जाधव यांनी बिनविरोध निवडीनंतर पहिल्याच दिवशी महानगरपालिका आरोग्य विभागाची बैठक घेत शहरातील आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती घेतली. यावेळी उपमहापौर अॅड. जाधव यांनी सांगितले, आरोग्य हा विषय शहराच्या प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाचा आहे. नगरकरांचे आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहावे यासाठी महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करेल. शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
साथीचे आजार पसरणार नाहीत यासाठी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षणावर विशेष भर देण्यात येईल. स्वच्छ, सुंदर आणि हरित शहरासाठी महापालिका म्हणून आम्ही कमी पडणार नाही. प्रत्येक कामामध्ये नगरकरांचा सक्रिय सहभाग राहील, असे जाधव यांनी नमूद केले. बैठकीदरम्यान आरोग्य विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नगर शहरात सात प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्याअंतर्गत 18 उपकेंद्रांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. त्याचबरोबर दोन आपले दवाखाने व एक क्षयरोग नियंत्रण केंद्रही कार्यरत आहे. या सर्व केंद्रांच्या कामकाजाची स्थिती, उपलब्ध कर्मचारी, औषध साठा व नागरिकांना दिल्या जाणार्या सेवांची माहितीही उपमहापौरांनी घेतली.
त्यांनी संबंधित अधिकार्यांना सांगितले की, डॉक्टर, नर्स, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अडचणी लेखी स्वरूपात द्याव्यात; त्या तातडीने सोडविल्या जातील. मात्र, कामचुकारपणा सहन केला जाणार नाही आणि जबाबदारी टाळणार्यांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. या बैठकीस अमोल गाडे, नगरसेवक करण कराळे, सुजित मोहीते, वर्षा सानप, आयुषमान भारतचे जिल्हा समन्वयक अमित धाडगे, सतीश शिंदे, रोहन सानप, अभिषेक वाकळे, डॉ. दिलीप बागल, तसेच आरोग्य विभागातील डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.





