Tuesday, October 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAmit Shah : महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा, दिशा बदलणारी निवडणुक, अमित शाह...

Amit Shah : महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा, दिशा बदलणारी निवडणुक, अमित शाह यांचं मोठं विधान

मुंबई | Mumbai
काम करताना वाद होतच असतात पण ते वाद संपवता आले पाहिजेत. ज्या संघटनेत मतभेद असतात, वेगवेगळ्या दिशेने काम करतात, ती संघटना कधीच यशस्वी होत नाही. आपल्याला सर्वप्रथम निवडणुकीपूर्वी मतभेद दूर करायचे आहेत, असे सांगत २०२४ ला महायुतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे पण २०२९ मध्ये एकट्या भाजपचे सरकार आणायचे आहे, असे मोठे वक्तव्य भाजपचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह मंगळवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संपूर्ण भाषणात दोन वेळा स्वबळावर सरकार आणायचे असा नारा दिला. त्यामुळे भाजपची एकट्याच्या बळावर सत्तास्थापन करण्याची महत्त्वकांक्षा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. शक्ती कार्यकर्त्यांची – प्रचिती आत्मविश्वासाची टॅगलाईन खाली भाजपकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर अमित शाह मुंबई, ठाणे आणि कोकण मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.

- Advertisement -

दादरच्या योगी सभागृहात झालेल्या संवाद मेळाव्यास अमित शाहांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, केंद्रीय सह संघटन मंत्री व्ही सतिष, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक संचालन समिती प्रमुख रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मुंबई कोअर कमिटीचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

देशाची दशा आणि दिशा बदलणारी निवडणुक
अमित शाह म्हणाले की, गेल्या ६० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग तीन वेळा सरकार बनविण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केला. महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलणारी निवडणूक आहे आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महायुती जिंकणार. महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढवा, विजय महायुतीचाच होईल. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रात महायुतीला रोखण्याची ताकद कुठल्याही पक्षात नाही.

निराशेला गाडून कामाला लागा
लोकसभेत २ जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते अशी आठवण सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेन असा शब्द देत असल्याचे विधान केले आहे. “निराशेला गाडून कामाला लागा. लोकसभेत २ जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते. मी शब्द देतो महाराष्ट्र भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेन,” असा निर्धार अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

६ विधानसभा आपण जिंकू
६ लोकसभा अशा आहेत जिथे ५ विधानसभांमध्ये आपल्याला बहुमत होते. पण १ ठिकाणी ते बहुमत घेऊन जिंकले. याचा अर्थ ६ विधानसभा आपण जिंकू तर एकच ते जिंकतील.
याचा अर्थ समजतोय ना… महाराष्ट्र प्रदेश जी योजना आखेल ती कार्यान्वित करा मंडल व वॉर्ड स्तरावर योजना पोहोचवा. विजय आपलाच असेल, असे म्हणत अमित शाह यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.

भाजप विचारधारेवर काम करण्यासाठी
भाजप राज्य करण्यासाठी सत्तेत नाही तर विचारधारेवर काम करण्यासाठी सत्तेत आहे असे सांगत अमित शाह म्हणाले की, राम मंदिर, ३७० हटवणे हे काम करण्यासाठी भाजप सत्तेत आली. महाराष्ट्रात निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा लागू करणार. महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. भाजपचे सरकार आल्यानंतर गेल्या १० वर्षात दहशतवाद आणि नक्षलवाद गाडला गेला. मोदीजींच्या नेतृत्त्वामुळे जगात भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.

भपकेबाजपणाने निवडणूक जिंकता येत नाही
भपकेबाजपणाने निवडणूक जिंकता येत नाही असे सांगत दिखावा करणाऱ्या आमदार आणि नेत्यांना अमित शाह यांनी खडसावले. मतं वाढवल्याशिवाय निवडणूक जिंकता येणार नाही. म्हणून मतदानाचा आकडा वाढवण्यासाठी प्रयत्न करा. मतदार नसलेल्या घटकांना भाजपशी जोडा. प्रत्येक घरात वाद असतातच, मात्र हे वाद आणि मतभेद विधानसभेपुर्वी दूर करा. काहींना कामे करायची नसतात पण खरा कार्यकर्ता काम करताना विचार करत नाही असे सांगत त्यांनी भाजपातील पक्षांतर्गत वादावर परखड भाष्य केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या