मालेगाव | Malegaon
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदाह हल्लाबोल केला आहे. ते मालेगावमध्ये बोलत होते. पवार साहेब आपण १० वर्ष कृषी मंत्री राहिलात, त्यावेळी सहकार क्षेत्र आपल्याकडे होते, आपण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी, सहकारासाठी काय केले? असा सवाल यावेळी अमित शाह यांनी उपस्थित केला आहे. नाशिकमधील अजंग येथील शेतकऱ्यांसाठी असलेले माती परीक्षण केंद्र आणि अगरबत्ती कारखान्याचे उद्घाटन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झालं. अजंग येथील व्यंकटेशा फॉर्म या ठिकाणच्या सभेतून त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचा ४६ हजार कोटी रुपये टॅक्स कमी करण्याचे काम आमच्या सरकारने केले. पवार साहेब आपण १० वर्ष कृषी मंत्री राहिलात, त्यावेळी सहकार क्षेत्र आपल्याकडे होते, आपण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी, सहकरासाठी काय केले? मार्केटिंग नेता बनून फिरणे सोपे आहे, जमिनीवर राहून काम करणे गरजेचे असते असा हल्लाबोल यावेळी अमित शाह यांनी शरद पवारांवर केला आहे.
अमित शाह म्हणाले की, “लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला होता. मोदींनी ‘जय जवान,जय किसान आणि जय विज्ञान’चा नारा दिला. सहकार आणि विज्ञान याची जोड दिली तर शेती फायदेशीर ठरते. मोदींनी माती परीक्षणाला सुरवात केली तेव्हा मातीत कोणती पिके घ्यावी आणि कोणती घेऊ नयेत हे शेतकऱ्यांना समजले. पाण्यात पीएच मात्रा किती, सल्फर टाकायचे की नाही, कोणते पीक घ्यावे याची माहिती मिळते. लॅब तुम्ही बनवली पण ऑर्गनिक परीक्षण लॅब बनवा. भारत सरकारकडून तुम्हाला मदत मिळेल.”
ऑर्गेनिक कॉर्पोरेट स्थापन करून शेती माल विक्री करून जो पैसा येणार तो शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. ऑर्गेनिक प्रमाणपत्र असणारे प्रोडक्ट तयार करा असे आवाहन यावेळी अमित शाहांनी शेतकऱ्यांनी केले. जवान आणि किसान हे दोघेच ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता भारत माताची सेवा करतात, असेही ते म्हणाले.
सहकार मंत्रालयाने ऑरगॅनिक को ऑपरेटिव्ह लिमिटेड तयार केले आहे. या माध्यमातून येणारा फायदा थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर जाणार आहे. त्यासाठी लागणारे प्रमाणपत्र ही संस्था देणार आहे. आत्म निर्भरतेची सर्वात सुंदर व्याख्या सहकार आहे. त्यामुळे मोदींनी सहकार ते समृद्धी असा नारा दिला आहे. या संस्थेत १ लाखांहून अधिक सदस्य आहेत इथे अत्यंत सुंदर ड्रिप व्यवस्था आहे. ८० टक्के शेती इथे ड्रीपद्वारे होते, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा