अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अमृत महाआवास अभियानंतर्गत अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट ठरला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजना या दोन्ही योजनेत जिल्ह्यास प्रथम पुरस्कार मिळाला असून शासनाने जाहीर केलेल्या पाच मानांकनामध्ये जिल्ह्यास 6 पुरस्कार प्राप्त झाले. मंगळवारी पुण्यातील बालेवाडी क्रिडा संकुलात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांनी पुरस्कार स्वीकारला.
अमृत महाआवास अभियान 2022-23 या आर्थिक वर्षात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, प्रकल्प संचालक राहुल शेळके, सहाय्यक अभियंता किरण साळवे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अमृत महाआवास अभियान राज्यात 20 नोव्हेबर 2022 ते 5 जुन 2023 या कालावधीत राबविले. जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास 15 हजार 322 व राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत 5 हजार 42 असे 20 हजार 364 घरकुले अभियान काळात पूर्ण करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 10 गृहसंकुले उभारुन 300 लाभार्थींना सर्व सुविधांयुक्त घरकुलांचा लाभ देण्यात आलेला आहे.
शासनाने वितरीत केलेल्या पुरस्कारांपैकी सर्वात जास्त पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाले आहे. त्यात प्रधानमंत्री आवास योजना राज्यात सर्वोत्कृष्ट जिल्हा अहिल्यानगर (प्रथम क्रमांक), प्रधानमंत्री आवास योजना राज्यात सर्वोत्कृष्ट तालुका पाथर्डी (प्रथम क्रमांक), राज्य पुरस्कृत आवास योजना राज्यात सर्वोत्कृष्ट जिल्हा अहिल्यानगर (प्रथम), राज्य पुरस्कृत योजना राज्यात सर्वोत्कृष्ट तालुका जामखेड (प्रथम), प्रधानमंत्री आवास योजना राज्यात सर्वोत्कृष्ट गृह संकुल ग्रामंपचायत वांगदरी, तालुका श्रीगोंदा, राज्य पुरस्कृत आवास योजना राज्यात सर्वोत्कृष्ट गृह संकुल -ग्रामपंचायत नांदगाव, तालुका नगर.