धुळे dhule। प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्र.15 मध्ये दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत एकही विकास काम झालेले नाही. रस्ते, गटार, पथदिवे, समाजमंदिर, पाण्याची टाकी, स्वच्छता गृह, भूमिगत गटारी, वाचनालये यातील एकही समस्या सोडविण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाच्या दलित वस्ती सुधार योजेनेचा (Dalit Settlement Improvement Scheme) पुरता बोजवारा उडाला आहे. या योजनेंतर्गत आलेला निधी मग गेला कुठे? असा सवाल उपस्थित करीत आज परिसरातील नागरिकांनी ( citizens) मनपावर (municipality) आक्रोश मोर्चा (‘Akrosh’ march) काढला. प्रसंगी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
.
मोर्चाला फाशीपूलपासून सुरूवात करण्यात आली. मोर्चा पुढे बसस्थानक जेलरोडमार्गे महापालिकेवर धडकला. याबाबत मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, राज्य सरकार समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध विकास योजना राबवित आहे. यात अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेचाही समावेश आहे. या योजनेंतर्गत मनपामार्फत विविध विकास कामे केली जातात. प्रभाग क्र.15 मधील सिध्दार्थ नगर, नवजीवन नगर, देशमुख नगर या परिसरात सन 2018 ते आजपावेतो एकही विकास काम करण्यात आलेले नाही.
शासनाने दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मनपा प्रशासनाकडे भरपूर निधी पाठविला आहे. असे असताना दलित वस्तीत सन 2018 पासून आजपावेतो एकही काम करण्यात आलेले नाही. याची दखल घेवून परिसरात दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत आलेला निधी कुठे गेला? याची चौकशी करण्यात यावी व दलित वस्तीमध्ये त्वरीत कामे करण्यात यावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
मोर्चात किरण गायकवाड, प्रशांत जगताप, बबनराव गायकवाड, प्रशांत साळे, अॅड.अतुल जगताप, आनंद लोंढे, शंकर खरात, नागसेन बागुल, राज चव्हाण, गणेश शेलार, अॅड.सुरेश बागुल, वाल्मिक जाधव, बबलु गायकवाड, विनोद बाविस्कर, अशोक पटाईत, राकेश क्षिरसागर, शकील शेख, बबलु पाटील, दीपक साळुंके, हेमराज थाटशिंगार, अजिंक्य गायकवाड, अनिकेत गायकवाड, दिलीप कदम, विरू जाधव, राकेश मोरे, दगडू बाविस्कर, बबलु नवगिरे आदींसह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.