Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्याअन् ग्रामस्थांनी गावचं काढलं विकायला

अन् ग्रामस्थांनी गावचं काढलं विकायला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शेतमालाला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील (devla taluka) माळवाडी गावातील शेतकरी (farmers) व महिलांनी एकत्र येत ‘ संपूर्ण माळवाडी गाव विकणे आहे असा ठराव एकमताने केला आहे.

- Advertisement -

हा ठराव केंद्र व राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी अविनाश बागुल यांनी दिली. यासंदर्भात सोमवारी (दि.६) गावातील शेतकऱ्यांची बैठक होऊन या बैठकीत हा ठराव करण्यात आला. माळवाडी गावात सुमारे ५३४ हेक्टरवर शेतकरी शेती (farming) व्यवसाय करत असून त्यात भाजीपाला (vegetables), ऊस (sugar cane), कडधान्य आणि नगदी म्हणून प्रमुख कांद्याचे पिक घेतले जातात.

यामधील कोणत्याही शेती उत्पादित मालाला गेल्या ३ ते ४ वर्षापासून फुटी कवडीचाही भाव मिळत नाही. विशेष म्हणजे गावातील ९५ टक्के शेतकरी कांदा उत्पादक (Onion grower) शेतकरी आहेत. तर माळवाडी आणि फुलेमाळवाडी गांवासह देवळा तालुक्यातील शेतकरी कांदा (onion) या प्रमुख पिकावर आपला उदरनिर्वाह व भविष्य बघत आहे.

त्याचबरोबर येथील शेतकऱ्यांना या शेती व्यवसायातून कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण, लग्न आणि मुख्य म्हणजे दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणार पैसाही उपलब्ध होत नाही. तसेच दैनंदिन गरजा व खाजगी सरकारी बँक कर्ज (Bank loan) चुकविण्यासाठी देखील याठिकाणच्या शेतकऱ्यांकडे आज रोजी कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांनी संपूर्ण माळवाडी गाव विकण्याचा ठराव गावात एक सभा घेऊन पास केला आहे.

तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्यासाठी व कर्ज मुक्त करण्या इतक्या शेती उत्पादित मालाला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे ते सरकारने विकत घ्यावे, अशी मागणी देखील येथील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, या ठरावासाठी अमोल बागुल, प्रवीण बागुल, राकेश सोनवणे, अविनाश बागुल, अक्षय शेवाळे, यांच्यासह आदींनी सभा आयोजित करून सर्वानुमते ठराव पास केला. या ठरावाला अनेक शेतकऱ्यांनी अनुमोदन देत सह्या केल्या आहेत.

कुठल्याही शेती मालाला भाव नाहीत, म्हणून उदरनिर्वाहासाठी आत्महत्या करण्यापेक्षा जमिनी विकून जगता यावे म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी गाव विकण्याचा एकमताने ठराव करीत आहोत. यात केंद्र राज्य शासनाने आमच्या जमिनी घेऊन आम्हला पैसे उपलब्ध करून द्यावेत अशी आमची मागणी आहे.

– प्रवीण बागुल (सुशिक्षित बेरोजगार शेतकरी, माळवाडी)

- Advertisment -

ताज्या बातम्या